पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/185

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१७५]

पाहिजे व मजुरी कमी झाल्यास नफा वाढला पाहिजे. म्हणजे मजूर व कारखानदार यांचें हित परस्परावलंबी नसून परस्परविरोधी आहे. जी गोष्ट मजुराच्या हिताची ती कारखानदाराच्या अहिताची व उलटपक्षीं जी गोष्ट कारखानदारांच्या हिताची तीच गोष्ट मजुरांच्या अहिताच. मजूर व कारखानदार यांमधील हा विरोधाभाव रिकार्डोनें आपल्या ग्रंथांत मोठ्या प्रामुख्यानें पुढे आणला आहे व सामाजिकपंथ म्हणून जो स्वतंत्र पंथ अर्थशास्त्रामध्यें निघाला आहे तो रिकार्डोच्या एककल्ली मताचाच परिणाम होय हें पुढें सामाजिक पंथाचा इतिहास देतांना सांगावयाचें आहे.
 परंतु रिकार्डोचें हें म्हणणें सवस्वी खरें नाहीं. कारण जर मालाला मागणी वाढली व पदार्थाच्या किंमती वाढल्या तर मजुरी व नफा हे दोन्हींही वांटे एकदम वाढूं शकतात. म्हणजे मजूर व कारखानदार यांच्या हितांत, नेहेमीं विरोध असतो व विरोध असलाच पाहिजे असा कांहीं नियम नाहीं. वास्तविक पाहतां मज़र व कारखानदार या दोघांचेंही हित परस्परावलंबी असून तें व्यापाराच्या व धंद्याच्या तेजीवर अवलंबून आहे. कोणत्याही कारणानें मालाला मागणी कमी झाली तर दोघांचेंही चुकसान होतें.
 आभिमत अर्थशास्रकारांचा नफ्याबद्दल आणखी एक वादग्रस्त सिद्वांत आहे. तो हा कीं, सर्व धंद्यांतील नफा समाजाच्या प्रगतविरोबर कमी कमी होत जातो. इतकेंच नव्हे तर सर्व धंद्यांवरील व सर्व व्यापारांतील नफ्याचा दर एकच होत जातो. निदान नफ्याच्या दराचा एकीभावाकडे कल तरी असतो. हा सिद्धांतही अभिमत अर्थशास्त्रकार चढाओढीच्या तत्त्वानेंच प्रतिपादतात. एका धंद्यामध्यें दुसऱ्या धंद्यापेक्षां नफ्याचें प्रमाण जर जास्त असेल तर देशांतील भांडवलाचा ओघ त्या धंद्याकडे जास्त वळेल व जोंपर्यंत या धंद्यांतील नफ्याचें प्रमाण इतर धंद्यांतील नफ्यांच्या प्रमाणापेक्षां जास्त राहील तोंपर्यंत हा क्रम अव्याहत चालू राहील. ज्याप्रमाणें दोन निरनिराळ्या पातळींत असलेल्या तळ्यांतील पाणी एका पातळीला येईपर्यंत एकांतून दुसऱ्यामध्यें पाण्याचा सारखा ओघ चालेल त्याप्रमाणेच धंद्यांची गोष्ट आहे. तेव्हां सर्व धंद्यांचा नफा सारखाच. असणे हीच धंद्यांची स्थिर स्थिति होय. तेथपर्यंत चढाओढीचें कार्य सारखे सुरू राहिलेंच पाहिजे. आतां अॅडम स्मिथनें मजुरी व नफ्याच्या दरांमध्यें भेद करणारी