पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१४५]

या ऐतिहासिक अंगाकडे न वळतां प्रथमतः रिकार्डोच्या उपपत्तीकडे वळूं.
 "ज्या देशांत सुपीक व उंची जमीन मुबलक आहे अशा कोणत्याही नव्या वसाहतीच्या देशांत तेथील लोकांच्या उपजीविकेकरितां सर्व जमीनाची लागवड करण्याची जरुरी नसते व लोकांच्या जवळ तितकें भांडवलही नसतें. अशा स्थितींत जमीन कसणारे लोक सर्वांत सुपीक अशीच जमीन लागवडीस आणतील व या काळीं जमिनीबद्दल भाडें अगर खंड याचा प्रादुर्भावच होणार नाहीं. कारण जोंपर्यंत देशांत फुकट पडलेली मुबलक जमीन आहे व ज्याला वाटेल त्यानें जमीन घेऊन कसावी अशी स्थिति आहे तोपर्यंत जमिनीच्या उपयोगाकरितां कोणीही भाडें अगर खंड देणार नाहीं. ' मागणी व पुरवठा' या सामान्य तत्वानुरूप ज्याप्रमाणें अमर्याद प्रमाणांत सांपडणा-या हवा पाणी किंवा सृष्टीच्या इतर देणग्या यांना भाडें अगर खंड मिळणार नाहीं त्याप्रमाणेंच या काळीं जमिनीच्या उपयोगाबद्दल खंड मिळणार नाहीं. जर देशांतील सर्व जमीन सारखीच सुपीक असती, जर बाजारापासून सर्व जमीन सारख्याच अंतरावर असती, जर ती संख्येनें अमर्याद असती व गुणामध्यें सारखीच असती तर तिच्या उपयोगाकरितां कोणताही आकार मागतां आला नसता. ह्मणून ज्या अर्थी जमीन ही परिमाणांत अमर्याद नाहीं व गुणांतही समान नाहीं व देशाच्या वस्तीच्या वाढीबरोबर व भरभराटीबरोबर हलकी जमीन लागवडीस आणावी लागते त्या अर्थीं जमिनीबदल खंड देण्याचें कारण पडतें. समाजाच्या प्रगतीमध्यें दुस-या दर्जाची जमीन लागवडीस आल्याबरोबर पहिल्या दर्जाच्या जमिनीवर खंड सुरु होतो व त्या खंडाची रक्कमही त्या दोन जमिनीच्या मगदुरांच्या फरकावर अवलंबून असते."
 या उपपत्तीचा मथितार्थ हा आहे कीं, देशामध्यें निरनिराळ्या मगदुरांची जमीन असते व ती बाजारापासून कमी अधिक अंतरावर असते. या दोहों मिळून जमिनीची सुपीकता ठरते. तेव्हां देशामध्यें कर्म अधिक सुपीक जमीन असली ह्मणजे जमिनीचें भाडें या कमी अधिक सुपीकतेवर अवलंबून असतें. या खंडाची रकम लागवडींत असलेली अगदीं वाईट जमीनजिचा खंड येऊं शकत नाहीं अशी बिनखंडी जमीन-व सुपीक जमीन यामधील फरकावर अवलंबून आहे. समजा एखाद्या प्रांतांत ४ मगदुराच्या १०