पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[१२१]

मोठ्या प्रमाणावर चालतात त्या वेळीं संपत्तीची उत्पत्ति व व्यय यांच्या अंतरानें भांडवल शिल्लक पडत जात नाहीं; तर कारखानदाराचा माल भराभर खपला पाहिजे म्हणजे दुस-या लोकांनींं त्याचा उपभोग घेतला पाहिजे व अशा त-हेनें व्यापाराला तेजी असली म्हणजे कारखानदारास नफा होती व या नफ्यापेैकीं त्यानें कमी खर्च केला व शिल्लक ठेविली म्हणजे भांडवल वाटतें. तेव्हां सुधारलेल्या औद्योगिक बाबतींत पुढारलेल्या समाजांत नफ्याच्या शिलकेंतून भांडवल वाढतें; निवळ संपत्तीच्या शिलकेंतून भांडवल वाढत नाहीं. समाजाच्या बाल्यावस्थेमध्यें प्रत्यक्ष संपत्ति शिल्लक टाकल्यानें भांडवल वाढतें. परंतु पुढें हा साधा प्रकार राहत नाहीं व त्याला मोठें गुंतागुंतीचें स्वरूप येतें.
 तेव्हां काटकसर याचा मर्यादित अर्थ घेतला पाहिजे. व काटकसर याचा चटकन् ध्यानांत येणारा अर्थ-खर्च कमी करणें-हा अर्थशास्त्रांतील खरा अर्थ,नव्हें हें ध्यानांत ठेवलें पाहिजे. अर्थशास्त्रदृष्टया काटकसर ह्मणजे [प्रत्येक मनुष्यानें पुष्कळ खर्च करणें; परंतु आपलें उत्पन्न खर्चापेक्षांही जास्त करणें होय; असा अर्थ धरला म्हणजे नव्या जुन्या अर्थशास्त्रकारांच्या मतांची संगति लागते.
 आतां या मयोदित अर्थीं शिल्लक टाकण्यास कोणत्या गोष्टी अनुकूल आहेत याचा विचार करणें इष्ट होईल.
 शिल्लक टाकण्याला पहिली अनुकूल गोष्ट म्हणजे मनुष्याची दूरदृष्टि ही हेोय. अगदीं रानटी स्थितींत या बाबतींत पशू व मनुष्य यांमध्यें फारसें अंतर नसतें, परंतु जसजसे मनुष्याचें ज्ञान वाढतें तसतशी ही दूरदृष्टि वाढत जाते. भावी वासना किंवा भविष्यत्काळी उत्पन्न होणा-या गरजा याची आधीं तरतूद करण्याची प्रवृत्ति जसजशी वाढलेली असते त्या त्या मानानें मनुष्यसमाजाची सुधारणा झालेली आहे असें म्हणण्यास हरकत नाही. म्हणजे ही दूरदृष्टि हें मानवी सुधारणा मोजण्याचें एकप्रकारचें माप आहे असें म्हटलें तरी चालेल. कांहीं रानटी जातींंची सुधारणा कधींंच होत नाहीं. कारण, त्यांच्यामध्यें हा गुण उद्भूतच झालेला नसतो. कारण भावी वासना आपल्या मनापुढें मूर्तिमंत उभी करणारी कल्पनाशक्ति इचा या लोकांमध्यें अभाव असतो. रानटी मनुष्य आतांची वासना तृप्त करण्याकरितां उदाहरणार्थ, फळ काढण्याकरितां झाड तोडण्यास कमी करणार