पान:Aagarakar.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 आगरकर : व्यक्ति आणि विचार 3८

pursuing our own in our own way, so long as we do not attempt to deprive others of theirs or their efforts to obtain it.' दुसऱ्याच्या स्वातंत्र्याच्या आड जें येत नाहीं तेंच खरें स्वातंत्र्य या मिल्लच्या उक्तींतलें मर्म त्यांच्या प्रतिपादनांत पूर्णपणे बिंबित झालेलें आहे. म्हणून मानवजातीच्या बाल्यावस्थेंत स्थापन झालेले,परलोकाकडे फाजील लक्ष लावून बसलेले आणि अनेक कारणांनीं खऱ्याखुऱ्या जीवनमूल्यांना विसरून गेलेले पृथ्वीच्या पाठीवरले सर्व धर्म यापुढें निस्तेज होत जाणार हें भविष्य वर्तवितांना नव्या सार्वत्रिक भावी धर्माचें स्वरूप निश्चित करायला ते विसरले नाहींत,'मनुष्यतेचें ऐहिक सुखवर्धन'हाच त्यांनी घोषित केलेला सार्वत्रिक भावी धर्म आहे. मानवी जीवन संकुचित करणाऱ्या जातींच्या आणि धर्मांच्या भिंती यापुढें जमीनदोस्त केल्या पाहिजेत, एवढेच नव्हे तर राष्ट्राराष्ट्रामधल्या दुर्लंघ्य गगनचुंबी भिंतीसुद्धां शक्य तितक्या लवकर कोसळून पाडल्या पाहिजेत, असें आगरकरांना वाटत होतें यांत मुळींच शंका नाही. महाराष्ट्रातल्या पांढरपेशा वर्गाच्या सामाजिक दुःखांविषयींच त्यांनी मुख्यतः लिहिलें असलें तरी 'मनुष्यतेचें ऐहिक सुखवर्धन' हाच उद्यांच्या जगाचा धर्म होणार आहे हें आपलें सुंदर स्वप्न बोलून दाखविल्यावांचून त्यांना राहवलें नाहीं. एखाद्यानें ईश्वराचें अस्तित्व अमान्य केलें,मनुष्यांच्या पापापुण्यांचा हिशोब लिहिणारा चित्रगुप्त ही एक अद्भुतरम्य कल्पना आहे असें म्हटलें, किंवा दुनियेच्या या दोन घटकेच्या वस्तीकरतां येणाऱ्या प्राण्याचें भूतभविष्य कुणालाही कळणें शक्य नाहीं असें प्रतिपादन केलें, म्हणून कांहीं त्याला कुठलींच नीतिमूल्यें संमत नाहींत असें होत नाहीं. उलट काल्पनिक गोष्टींवर अंधश्रद्धा ठेवून निर्माण केलेल्या आणि केवळ रूढीमुळें पवित्र ठरलेल्या नीतिमूल्यांपेक्षां मानवी जीवनाचा सहानुभूतीनें आणि शास्त्रीय दृष्टीनें विचार करून निश्चित केलेलीं नीतिमूल्येंच अधिक सुखसंवर्धक ठरतील अशी खात्री वाटत असल्यामुळेंच तो 'जुनें जाउं द्या मरणालागुनि,जाळुनि किंवा पुरूनेि टाका' असें तडफेनें म्हणत असतो. -आगरकरांसारखे क्रांतिकारक जुन्या नीतीचा तीव्र निषेध करतात याचें कारण ते मानवी नीताचे खरेखुरे कैवारी असतात हेंच आहे. खरे सुधारक