पान:Aagarakar.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

११ गोपाळ गणेश आगरकर

दिलें नाहीं.आत्मविश्वास हा व्यक्तिविकासाचा पाया असतो, ही त्यांच्या विद्यार्थी जीवनाची शिकवण आहे. पण व्यक्तीपुढे जर उच्च सामाजिक ध्येय नसलें तर आत्मविश्वासाचें रूपांतर बहुधा अहंकारांत होतें. आगरकरांचें सामाजिक मन इतक्या लहानपणा जागृत झाले होतें आणि त्याची जागृति इतकी परमावधीला पोंचली होती कीं अहंकार त्यांच्या वा-याला सुद्धां कधीं उभा राहिला नाहीं. याविषयीं आगरकरांच्या पत्नी यशोदाबाई यांची एक आठवण ध्यानांत ठेवण्याजोगी आहे. त्या म्हणतात, रानड्यांच्याबद्दल ते नेहमीं माझ्यापाशीं मोठ्या आदरानें बोलत व म्हणत पुण्यांत काय किंवा सबंध महाराष्ट्रांत काय पुष्कळ लोक शिकून मानाच्या व अधिकाराच्या जागांवर चढलेले आहेत. ते सर्वे कोणी आपली संपाति वाढविण्याच्या खटपटींत आहेत, तर कोणी बायकामुलांत गुंग आहेत. पण रानड्यांच्या घरी आपलें केव्हांही या; देशोन्नतीचे विचार, चर्चा आणि तळमळ याविषयीं त्यांच्या आपल्या कांहीं तरी योजना सुरूच आहेत. रानड्यांचा हा आयुष्यक्रम पाहून आजार व प्रापंचिक गोष्टी यांत आपला फार वेळ जातो म्हणून त्यांना अतिशय वाईट वाटे. आपला आजार आपल्या देशसेवेच्या आड येत आहे म्हणून आगरकरांना वाईट वाटणे स्वाभाविक होतें. पण या आजाराची खंत करीत मात्र ते बसले नाहीत. त्यांचें लेखन गांभीर्य, आवेश आणि तळमळ यांनी भरलेलें असलें तरी ते विनोदाला पारखे नव्हते. किंबहुना मोठमोठ्या माणसांमध्यें सहसा न आढळणारी विनोददृष्टीची देणगी त्यांना लाभली होती. दम्यावर अनेक औषधे घेऊनही त्यांना मुळींच गुण आला नाहीं. दुस-या कुणीही हा निराशाजनक अनुभव कडवट शब्दांनी व्यक्त केला असता. पण अागर कर नेहमीं म्हणायचे, "माझा कोठा म्हणजे जगातील सर्व वनस्पतींची एक मात्राच बनली आहे. माझ्या मरणानंतर जर कोणी तो कोठा सांभाळून वाळवून ठेवला तर कदाचित् हेमगर्भाच्या मात्रेप्रमाणे जगाला या मात्रेचाही उपयोग होईल !" विनोद आणि सहृदयता ही तत्त्वतः सख्खीं भावंडे असलीं तरी व्यवहारांत त्यांचें नेहमीं पटतेंच असें नाहीं. विनोदाला सहृदयतेचा पाठिंबा नसेल तर तो धटिंगणाप्रमाणें वागूं लागतो. आणि सहृदयतेला विनोदाची जोड नसेल तर ती एखाद्या वेड्या बाईप्रमाणें एकच छंद घेऊन