पान:Aagarakar.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार १०. आपली प्रगति कुंठित करून घेतलेल्या हिंदु समाजाच्या गळीं अनेक कटु सत्यें उतरविण्याचे कार्य आगरकरांनीं ' सुधारक'काढल्या दिवसापासून निष्ठेनें आणि धैर्यानें केले. हिंदु समाजाला अधोगतीला नेणाऱ्या राक्षसी रुढीविरुद्ध त्यांनीं ' न भूतो न भविष्यति' असें युद्ध पुकारलें. या लोकविलक्षण लढाईत त्यांना सत्याशिवाय दुसरा कुणी सोबती नव्हता आणि लेखणीशिवाय त्यांच्या हातांत दुसरें कुठलेंही शस्त्र नव्हतें. कर्तव्य,केल्याच्या समाधानाशिवाय दुस-या कुठल्याही सुखाची त्यांना आशा नव्हती. पण ते अखंड लढत राहिंले. जखमांची पर्वा न करतां, अंगांतून वाहणा-या रक्ताच्या धारांकडे लक्ष न देतां ते आमरण झुंजत राहिले. त्यांच्या मृत्यूच्या वेळीं महाराष्ट्र हळहळत उद्गारला असेल, 'एक सत्पुरुष गेला.' पुढल्या पन्नास वर्षांनीं महाराष्ट्राची खात्री करून दिली कीं आगरकर नुसते सत्पुरुष नव्हते; ते महापुरुष होते. $४ आगरकरांच्या ज्या विशिष्ट गुणांनी त्यांना महापुरुष केलें, त्यांपैकी कांहींचीं बीजें त्यांच्या स्वभावांत लहानपणासूनच दृग्गोचर होत होतीं. ते अकोलें हायस्कुलांत शिकत असतांना विष्णु मोरेश्वर महाजनी त्यांचे शिक्षक होते. त्यांनीं आगरकरांचे वर्णन पुढे दिल्याप्रमाणे केले आहे : * अंगयष्टि उंच, सडपातळ व काटक होती. डोळे पाणीदार होते. भाषण ठसक्याचें व आत्मप्रत्ययानें मुसमुसलेलें असें होतें. स्वभाव मनमिळाऊ, लोकांच्या उपयोगी पडणारा असा होता. बुद्धि चपल व ग्राहक होती, स्मृति मध्यमावर. शब्दापेक्षां अर्थाकडे लक्ष फार. वेळ फुकट दवडायचा नाही असा निश्चय.' आगरकरांच्या या आत्मप्रत्ययाची त्या वेळची एक आख्यायिका प्रसिद्धच आहे. त्यांना शाळेंत यायला उशीर झालेला पाहून त्यांचे एक शिक्षक म्हणाले, 'तुम्ही असेच मागें पडणार ! तुमच्या हातून काय होणार आहे ?’ आगरकरांनीं लगेच शिक्षकांना उत्तर दिलें, 'आपल्यासारखा एम्. ए. होईन तरच नांवाचा आगरकर,' आगरकरांनीं या अभिमानाला अहंकाराचे स्वरूप मात्र कधींच येऊं