जमीयत उल उलेमाची भूमिका सांगत होते.
जून १९४७ उजाडला आणि आम्ही स्टेट काँग्रेसच्या अधिवेशनासाठी स्वयंसेवक म्हणून मैदानावर दाखल झालो. देशाची फाळणी होणार हे भवितव्य सर्वांच्या समोर होते. अधिवेशनाच्या आधी काही दिवस निजामाने आपण स्वतंत्र राहणार असे जाहीर केले होते. सारेच वातावरण समोर लढा दिसत असल्यामुळे उत्तेजित झाले होते. तरुणांच्यासमोर वोलताना बाबासाहेब परांजपे म्हणाले, “देह साडेतीन हाताचा असतो हे काही दिवस विसरा. त्यातले तीनच हात गृहीत धरा. कारण मरणाला सामोरे जावयाचे आहे." प्रत्यक्ष अधिवेशन दि. ११ जूनला सुरू झाले. तेव्हा फाळणीची योजना जाहीर झाली होती. पण अधिवेशनातील लढाऊ भाषणात मला कुठे फाळणीचे दुःख ऐकल्याचे स्मरत नाही. फाळणीच्या आम्ही सारेच विरोधी होतो. पण प्रत्यक्षात फाळणी झाली तेव्हा आम्हाला स्वातंत्र्याची आशा निर्माण झाली. अशक्य गोष्ट शक्य गृहीत धरून बोलायचे तर, मी असे म्हणेन की, भारत स्वतंत्र होताना जर अखंड राहिला तरीही आम्ही स्वातंत्र्योत्सव साजरा केला असता, पण जड मनाने. फाळणीच्या दुःखाने आजही शोक करणाऱ्यांना हे कळत नाही की, अखंड भारतात आम्ही गुलाम राहिलो असतो. महाराष्ट्र कधी अस्तित्वात आला नसता. भारत कधी बलवान झाला नसता.
पृज्य स्वामीजी म्हणत, हा लढा दुहेरी होता, निजाम, हैदराबादमधील मुस्लिम प्रजा, इत्तेहादुल मुसलमिन, रझाकार आणि सारे शासन हे लढा दडपीत नव्हते. ते आपल्या जुनाट अस्तित्वाच्या रक्षणासाठी लढत होते व नैराश्याने पिसाटपणे वागत होते. रझाकारांचे अत्याचार हा नैराश्याचा उद्रेक होता. त्यांचा लढा हा एक वेडा लढा होता. (दे वेअर मॅड इनसेन यू नो) आणि स्वतःविषयी ते म्हणत, जनता शौर्याने लढत होती आणि माझा लढा ‘भित्रा' म्हणत असे. त्याला स्वतःच्या मरणाची भीती नव्हती. रोज माणसे मरत होती. मधून मधून कार्यकर्तेही हौतात्म्य पत्करीत, त्याची क्षिती नव्हती. स्वामीजींना लढ्याच्या अपमृत्यूची भीती वाटे. दूरदर्शीपणाने निजामाने तडजोड केली तर प्रजेची गुलामी अमर झाली असती. भीती निजाम शुद्धीवर येण्याची होती. तडजोडाची तयारी हे आमचे मरण होते. त्याला मी भीत होतो, असे स्वामीजी म्हणत. स्वामीजी म्हणाले सतत तडजोडीचे प्रयत्न चालू होते. निजामाने भारतात विलीन होण्यास मान्यता द्यावी ह्या मोबदल्यात अनेक सवलतीची आश्वासन दिली जात