माहीत असावे की अलियावरजंग नावाचा माणूस महाराष्ट्राच्या राज्यपालपदी चढून पैगंबरवासी झाला. हा जर भारतीय असता तर भारताचा राष्ट्रपती होऊन पैगंबरवासी झाला असता. केवळ शत्रूच्या प्रदेशातील होता म्हणूनच तो राष्ट्रपती होऊ शकला नाही. यांच्या बौद्धिक ताकदीचा विचार जर आपण करू लागलो तर एक जीनाचा अपवाद वगळता याच्या बौद्धिक क्षमतेचा दुसरा मुसलमान भारतात नव्हता. याच्या जवळपास फिरकू शकेल असाही कोणी नव्हता. याची बौद्धिक क्षमता परमोच्च कोटीची होती. हाच तो माणूस की ज्याने सबंध इजिप्तचे राजकारण फिरविले आणि इजिप्त व भारत यात मैत्रीची पायाभरणी केली. हाच तो माणूस आहे की ज्याने अर्जेंटिना, चीनसारख्या अनेक देशांचे राजकारण अमेरिकेच्या विरोधात भारताला अनुकूल केले. हांच तो माणूस की ज्याने नाटो कराराच्या सर्व अटी गुंडाळून फ्रान्सला भारताच्या मदतीसाठी उद्युक्त केले. हाच तो माणूस की ज्याच्यावर नेहरूंचा खास विश्वास बसला आणि जो अमेरिकेत भारताचा वकील म्हणून पाठविला गेला. हा जर जास्त वेळ अमेरिकेत वकील म्हणून राहिला असता तर त्याने अनेक घडामोडी घडवून आणल्या असत्या. के.एम. पणिक्कर, गिरिजाशंकर वाजपई, के.पी.एस.मेनन इत्यादी मंडळी ज्या रांकेत बसतात त्या रांकेच्या तोलामोलाचा हा माणूस आहे. आणि हा निजामाने तयार केलेल्या मंडळीपैकी आहे.
निजामाने सर्व हैदराबाद संस्थानच्या औद्योगीकरणालाही आरंभ केला होता. त्याने कापडगिरण्या काढल्या, कोळशाच्या खाणी सुरू केल्या, सोन्याच्या खाणी सुरू केल्या, हिऱ्यांना पैलू पाडण्याचा उद्योग सुरू केला, सिमेंटचे कारखाने काढले, कागदाचे कारखाने काढले. जे लक्षणीय आहे असे औद्योगीकरण निझामाने स्वतःच्या कारकीर्दीत घडवून आणले.
निजामाला आणखीही एका गोष्टीची जाणीव होती. जर शेवटी एक ना एक दिवस आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचे असेल आणि ते टिकवायचे असेल तर आपल्या पाठीशी आंतरराष्ट्रीय मतकक्ष (International Lobby) हवा. हा कक्ष निर्माण करायचा असेल तर मध्य आशियामध्ये तुर्कस्थान, अरब राष्ट्रांमध्ये सौदी अरेबिया, शिया राष्ट्रांमध्ये इराण या तीनही ठिकाणी आपले संबंध असले पाहिजेत. यासाठी इराणच्या शहाची मुलगी निजामाने आपली सून करून घेतली. इराणच्या तेलाच्या खाणीत ब्रिटिश सरकारच्या परवानगीने त्या वेळेच्या दराने वीस कोटी रुपये गुंतविले. तुर्कस्थानची