मुंबई जिंकू, मद्रास जिंकू, हिंदूंच्या कत्तली करू, दिल्लीच्या लाल किल्ल्यावर निजामाचा झेंडा फडकवू, अशा घोषणा कासिम रझवी करीतच असत. ह्या घोषणांच्या बरोबर रझाकारांचे क्रौर्य व अत्याचार वाढतच असत, पण कासिम रझवी सुद्धा मुस्लिम समाजात धैर्य व शौर्य निर्माण करू शकत नसत. मनातून सगळा समाज बावरलेला, घाबरलेला असे. मध्येच एखादे गाव प्रतिकारासाठी सज्ज होई, हा प्रतिकार मोडून काढणे रझाकारांना फार कठीण जाई. पुढच्या कहाण्यामध्ये एक कहाणी हुतात्मा बहिरजींची आहे. हा माझ्याच तालुक्यातला हुतात्मा. त्याचे गाव वापटी. हे गाव तसे फारसे मोठे नव्हते. उणीपुरी तीन-चारशे ह्या गावची लोकसंख्या होती. लोकांच्या जवळ फारशी हत्यारे नव्हती. गोफण हे त्यांचे मुख्य हत्यार. असलेल्या लोकसंख्येत म्हातारे व मुले सोडल्यास प्रतिकारास सज्ज स्त्री-पुरुष ह्यांची संख्या दीडशेपेक्षाही कमी होती. ह्या गावावर दीडदीड हजार रझाकार बंदुका घेऊन हल्ला करण्यासाठी जात, आणि अयशस्वी होऊन परत येत. ह्या गावाने असे एकूण चार मोठे हल्ले त्या काळात परतवून लावले. एक तीनचारशे लोकसंख्येचे गाव अतिशय चिवटपणे सतत चार महिने टिकाव धरून राहते, ही गोष्ट रझाकारांच्या चिवटपणाची, धैर्याची, शौर्याची म्हणता येणार नाही. अशा घटना शेकडो ठिकाणी त्या काळी घडत. प्रत्यक्ष पोलिस अॅक्शन झाली, तेव्हाही प्रतिकार फारसा झालाच नाही. धैर्य सुटलेले रझाकार वाट सापडेल तसे पळतच राहिले. त्यांना विजय मिळवता आला नसताच, पण कुठे तरी चिवट प्रतिकार तर करता आला असता. पण ते घडलेले दिसत नाही. त्या पिसाट परंपरेत शांततेच्या काळात संयमाची प्रथा नाही; विजयात औदार्याची प्रथा नाही आणि प्रतिकूल परिस्थितीत मनाची जिद्द न गमावता चिवट प्रतिकार करण्याची प्रथा नाही. क्रौर्य आणि भेकडपणा, उद्दामपणा आणि हिंमत हरणे असा चमत्कारिक विसंवाद धर्मवेड्यांच्या ठिकाणी दिसावा हे आश्चर्य आहे. जैसे थे करार झाल्यानंतर वाटाघाटीचे दुसरे पर्व सुरू झाले. ह्या दुसऱ्या पर्वात मार्चअखेरपर्यंत फारसे काहीच घडले नाही. एप्रिलनंतर भारत सरकारच्या वतीने माऊन्टबॅटन ह्यांच्या आग्रहाखातर आणि सरदार पटेल यांच्या संमतीने दर फेरीत काही नव्या सवलती देऊन हा प्रश्न मिटवावा अशी माऊंटबॅटनची इच्छा होती. प्रत्येक सवलतीबरोवर हैदराबादेतील भ्रम आणि उद्धटपणा वाढतच जाणार आहे म्हणून जगासमोर हैदराबाद हास्यास्पद करून दाखवा दी सरदार पटेलांची इच्छा होती. पंडित नेहरू ह्यांना चालू आहे ते अजीबात मान्य नव्हते