पाण्याचा पुरवठा अगदी कमी झाला आहे, म्हणून जिकडे तिकडे हल्लीं जो बोभाटा कानीं येतो, त्याचे मुख्य कारण, उच्च प्रदेशावरील झाडोऱ्याचा नाश हे होय. अलीकडे पाऊसही कमी पडतो व त्यामुळे पूर्वीप्रमाणे जमिनीवर पाणीही विपुल पडत नाहीं. ह्यामुळेही झऱ्यांंस पाण्याचा पुरवठा थोडा कमी पडण्याचा संभव आहे असे वाटते खरे. परंतु हल्ली जितका पाऊस पडतो, त्यापैकी थोडा भाग जरी सांठून राहिला, तरी झऱ्यांंस पाण्याचा पुरवठा कमी होण्याचा बिलकुल संभव नाहीं. पावसापासून आपणांस पाणी किती प्राप्त होते, ह्याची कल्पना खाली लिहिलेल्या उदाहरणावरून करितां येईल.
आपल्या सह्याद्रीच्या माथ्यावर सरासरीने २५० इंच पाऊस पडतो, असे धरूं. ह्या मानाने एक एकर जमिनीवर एक वर्षामध्ये किती पाणी साचून राहते ते पाहू. एक एकर जमीन म्हणजे ४८४० चौरस यार्ड होय. व एका चौरस यार्डात ९ चौरस फूट असतात. म्हणून एका एकराचे ४८४० x ९=४३५६० चौरस फूट झाले. आतां २५० इंच पाऊस पडणे म्हणजे त्या जागेवरील पाणी वाहून गेले नसते, तर २५० इंच खोल पाणी साठून राहणे होय. २५० इंच म्हणजे २५०१२ फूट होत. म्हणजे प्रत्येक चौरस फूट जमिनीवर २५०१२ फूट पाणी साचते. एका एकरामध्ये ४३५६० फूट असतात. म्हणून एक एकर जमिनीवर ४३५६० x २५०१२ =९०७५०० घनफूट पाणी पडते. एक घनफूट पाण्याचे वजन ६२.५ पौंड असते. म्हणून ९०७५०० घनफूट पाण्याचे वजन ५६७१८७५० इतके