पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/10

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्याचे उन्नयन महत्त्वाचे मानले. हे महत्त्वाचे प्रकरण मराठीत आणून डॉ. लवटे यांनी आपल्या भाषेची सेवा केली आहे.
 राहुल सांस्कृत्यायन हे मार्क्सवादी विचारवंत व संशोधक. ते बौद्ध धर्माचे अभ्यासक होते. बौद्ध संस्कृती व बौद्ध यांचा प्रसार या विषयावर त्यांनी अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिले होते. या पुस्तकात त्यांनी बौद्ध संस्कृतीची ठळक वैशिष्ट्ये सांगून तिचा चीन, इंडोचीन, म्यानमार, कोरिया वगैरे देशात कसा प्रसार झाला याचे विवेचन केले आहे. त्यांच्यामते बौद्ध धर्माचा प्रसार अहिंसेच्या मार्गाने भिक्षंनी केला. तिबेटमध्ये बौद्धांनी भारतात नष्ट झालेले बौद्ध वाङ्मय जिवंत ठेवले ही महत्त्वाची गोष्ट आहे.
 जैनेंद्रकुमार हे हिंदीतील मोठे कादंबरीकार व विचारवंत. त्यांनी युरोप आणि भारत सांस्कृतिक चिकित्सेचे एक प्रश्नोपनिषद ‘समय और हम' या पुस्तकात ग्रंथित केले आहे. जैनेंद्र यांच्यावर महात्मा गांधी यांच्या विचारांचा सखोल असा प्रभाव होता. हे पुस्तक प्रश्न व उत्तर या स्वरूपात असून संस्कृतीविषयक प्रश्नांना जैनेंद्र यांनी समर्पक उत्तर देत आपले संस्कृतीविषयक विचार स्पष्ट केले आहेत. या पुस्तकास आचार्य दादा धर्माधिकारी यांची प्रस्तावना आहे. या पुस्तकात जैनेंद्र यांची वर्ग व राष्ट्र कल्पनांमुळे युरोपीय समाज कसे हिंसक व विभाजित बनले आहेत, हे सांगितले आहे. या समजात भौतिक समृद्धी आहे, पण मानसिक शांतता नाही. कारण ते अर्थ व काम पुरुषार्थाचे दास बनले आहेत. विज्ञानाचा उपयोग ते संहारासाठी करीत असून त्यातून हिंसक राष्ट्रवादास बळ मिळत आहे. भारतातील जातीयता संकीर्णता व हिंदू जमातवाद उदार व समन्वयवादी भारतीय संस्कृतीच्या विरुद्ध असून त्याच्या समाजात प्रचारामुळे व प्रसार समाजाचे स्थैर्य नष्ट करील असे त्यांचे मत होते. भारतीय भाषांना विशेषतः हिंदीला प्रतिष्ठा प्रदान करणे आवश्यक आहे. जैनेंद्रांच्या मते ‘‘साहित्य आणि संस्कृती यात जवळचे संबंध आहेत. साहित्याचे श्रेष्ठपण ते विशिष्ट काळ वा समाज यांचे किती चांगल्या प्रकारे चित्रण करते यात सामावलेले असून ते मानवी आत्म्याची स्पंदने किती गंभीरपणे चित्रित करते यावर अवलंबून असते.”
 विष्णु प्रभाकर या ज्येष्ठ हिंदी लेखकाच्या संस्कृतीवरील दोन लेख संग्रहाचे आधारे डॉ. लवटे यांनी त्यांचा संस्कृती विचार समजावून सांगितला आहे. विष्णु प्रभाकर यांच्यामते संस्कृती हा शब्द संस्कार व सृजन यावर आधारलेला आहे. ज्या समाजात सृजनशीलता व प्रगल्भता आहे, त्याची संस्कृती वरच्या दर्जाची असते व तो समाज आंतरिक शांतता व समाधान