पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अंधश्रद्धामुक्त जीवनाची गरज


 आपल्याकडे व्यक्ती बद्दल ब-याच वेळा चुकीच्या समजुती पसरविल्या जात असतात. दत्ता बाळ यांच्याबाबतीत तुम्हाला हे सांगता येईल. दत्ता बाळ हे कोण होते? ते योगी होते की विचारवंत होते? त्यांना धर्म श्रेष्ठ होता की अध्यात्म? ते वैज्ञानिक होते का? असे प्रश्न केव्हातरी आपण माणसाच्या बाबतीत उभे केले पाहिजेत आणि ते उभे केल्यानंतर प्राप्त पुराव्यांच्या आधारे जेव्हा तुम्ही माणसे वाचायला लागता तेव्हा आपले सगळे गैरसमज दूर होतात. तसे दत्ता बाळ यांच्या बाबतीत सांगता येईल. दत्ता बाळ हे पूर्णतः वैज्ञानिक विचार करणारे गृहस्थ होते. जगामध्ये ‘विज्ञान आणि अंधश्रद्धा' यांचा संघर्ष शतकानुशतके सुरू आहे आणि या संघर्षाची, विवादाची सुरुवात माणूस जेव्हा प्रश्न करायला लागला तेव्हापासून झाली.

आज आपण एकोणीसशे, वीसशे शतके मागे टाकून एकविसाव्या शतकात प्रवेश करते झाले आहोत, त्याचे एक तपही उलटलेले आहे. पूर्वी जेव्हा मनुष्य विचार करीत नव्हता, तेव्हा तो कुठेतरी जंगलात, गुहेमध्ये राहायचा. त्या काळी माणसाला निसर्गाचे प्रचंड भय होते. त्याला माहीत नव्हते की, निसर्गामध्ये ज्या उलथापालथी होतात, त्यांचा स्वत:चा असा एक क्रम आहे आणि मनुष्य तो थोपवू शकत नाही. विज्ञानाच्या जोरावर आज माणसाने इतकी शक्ती मिळवली; पण तरीसुद्धा माणसाला हा निसर्गाचा क्रम थांबविता आला नाही. जेव्हा माणसाला स्वत:च्या शक्तीचा परिचय नव्हता, अशा काळात माणसाचे भिणे आणि २०१४ साली माणसाचे भिणे यांत फरक आहे. वनमनुष्य निसर्गाला घाबरायचा. त्याला आकलन नसल्याने तो घाबरायचा. आकलन होऊनसुद्धा मनुष्य घाबरतो तेव्हा विचार करण्यासारखी गोष्ट असते. विज्ञानाचा पदवीधर, शिक्षक, पीएच. डी.धारक माणूस जेव्हा कर्मकांड करायला लागतो तेव्हा मात्र मला जास्त भीती वाटते. भीती वाटण्याचे कारण म्हणजे मनुष्य शिकला की नाही? आणि शिकला तर काय

सामाजिक समाजवेध/८३