पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 अर्भकालयातली जी मुलं पूर्ण अनाथ, निराधार असतात, त्यांना दत्तक दिलं जाऊन आई, बाबा, घर, नाव, संपत्ती, अधिकार देऊन नागरिक बनण्यास मदत केली जाते. जी मुलं दत्तक जाऊ शकत नाहीत, ज्यांचे आई-बाबा असतात वा दूरचे नातेवाईक असतात; पण जे अशा काही मुलांचा घरी सांभाळ करू शकत नाहीत, अशी मुलं-मुली वर्षांपेक्षा मोठी झाली की वेगळ्या संस्थांत पाठविली जातात. तिथं त्यांचं शिक्षण, संगोपन होत राहतं. व्यसनाधीन पालक, दुभंगलेली कुटुंबे, बंदीजनांची अपत्ये सा-यांचा सांभाळ होत रहातो.
महिला आधारगृह/महिलाश्रम
 अठरा वर्षांवरील कुमारी माता, बलात्कारित भगिनी, परित्यक्ता, घटस्फोटिता, वेश्या, देवदासी, घर सोडून पळून, भांडून आलेल्या अशा कितीतरी भगिनींचा सांभाळ करणारं हे माहेर. हो, माहेर! कारण यांना समजून घेऊन, समजावून सांगून त्यांना समाजापासून संरक्षित केलं जातं. यांच्यासाठी समाज असुरक्षित बनलेला असतो, हे आपण समजून घेतलं पाहिजे. कुमारी माता आली तर तिच्या इच्छेनुसार गर्भपात, बाळंतपण होणार असेल तर तोपर्यंतचा सांभाळ, बाळंतपण, नंतर बाळाचं दत्तकीकरण, या मुलींचे नंतर विवाह, माहेरपण, डोहाळे सारं संस्था करीत असते. तिथले अधिकारी, कर्मचारी, काळजीवाहक डोळ्यांत तेल घालून त्यांची काळजी घेत असतात. हे खरं असलं तरी ते आई, वडील, पती, प्रियकर होऊ शकत नाहीत. पर्यायी पालकाची भूमिका संस्था अधिकारी, कर्मचारी बजावत असतात. मुली-महिलांत बहीण, मैत्रीण, मावशी, काकी, मामी इत्यादी नाती आकार घेतात. ती संस्थेत असेपर्यंत राहतात. काहींची नंतरही सांभाळली जातात. अशा संस्थात्मक कुटुंबांचं एक बरं असतं, इथं घरासारखी नाती लादली जात नाहीत, ती लाभतात. इथली नाती ऐच्छिक असतात. इथं सक्तीच्या नात्यांचा धाक, काच नसतो.
बालकाश्रम/बालिकाश्रम

 वय वर्षे ६ ते १८ वयोगटातील अनाथ, निराधार मुला-मुलींच्या स्वतंत्र संस्था असतात. काही ठिकाणी (महिलाश्रम) १० वर्षांपर्यंतची मुलं व १८ वर्षांपर्यंतच्या मुलींचा एकत्र सांभाळ होत असायचा. आता माध्यमांच्या विकासामुळे मुलं-मुली लवकर प्रौढ होऊ लागली. त्यांना लवकर समजू लागलं म्हणून ती स्वतंत्र सांभाळली जातात. या वयोगटातील मुला-मुलींच्या सामाजिक प्रश्नांवर, स्वरूपावर आधारित वेगवेगळ्या संस्था

सामाजिक विकासवेध/७६