पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हरवलेले... गवसलेले...


 रेल्वेच्या प्रवासाचं एक दृश्य लहानपणापासून माझ्या मनावर कोरलेलं आहे. रेल्वे झुक झुक करीत पुढे धावत असते आणि दुतर्फा असलेली झाडे, शेतं, घरं, गुरं, रस्ते मागं पळत असतात नि पडतही. काळही असाच असतो. भूतकाळ मागे पडतो अन् वर्तमान नित्य, नवं घेऊन नटून, थटून मिरवीत असतो. त्याच्या हे गावी नसतं की येणारा भविष्यकाळ त्याची सारी नशा, सारा तोरा क्षणात उतरवणार आहे. काळाच्या या विविध रूपांमुळेच खरं तर जग, जगणं, जीवन सुंदर बनतं.
 मी जे सांगू, लिह मागतो आहे ना, ते मात्र नव्या पिढीसाठी. माझ्या पिढीनं जन्माला घातलेल्या पिढीसाठी. माझ्या पिढीसाठी म्हणाल तर ही उजळणी होईल किंवा स्मरणरंजन! हवं तर रवंथ म्हणा! नव्या पिढीला रवंथ शब्दच नवा. तो त्यांच्या मोबाईल अॅप्सच्या डिक्शनरीत असेलच असं नाही. खरं तर नसण्याचीच शक्यता जास्त. या रवंथ शब्दावरून आठवलं,आमच्या काळातील किती गोष्टी नव्या पिढीस माहीत असणं शक्यच नाही. किंबहुना ती पिढी जन्माला येण्यापूर्वीच त्या खरं तर गायब झाल्या, काळाच्या पडद्याआड गेल्या. नुसती नावं सांगितली तरी ही पिढी चकित होईल. काटवट, कंदील, उखळ, पाटा, वरवंटा, बाराबंदी, बोरू, दौत, किल्ला, खलबत्ता, फिरकीचा तांब्या, होल्डॉल, सारवट गाडी, छकडा, डांगर, कुळीथ, सातू, वासुदेव, वार लावून शिकणे, इत्यादी इत्यादी. काळ मोठा कठोर असतो नि चपळही!
लिहिणं अन् टाईप करणं

 साधी लिहायची गोष्ट घ्या ना. गेल्या पन्नास वर्षांत किती बदल झाला म्हणून सांगू! पूर्वी म्हणे लिहिणा-यालाच कागद, शाई, रंग, बोरू तयार करायला लागायचा! तो काळ काही मी पाहिला, अनुभवला नाही; पण जे अगदी लहानपणी लिहिलं, त्याच्या आठवणी मात्र जशाच्या तशा आहेत.

सामाजिक विकासवेध/६३