पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कारणं सांगता येतील. सार्वजनिक समारंभातून कितीतरी उपचारांना फाटा देणं शक्य आहे. ते देत नाहीत. आपण परंपरावादी आहोत. पाहुण्याला एकाच वेळी शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, पान, सुपारी, गुच्छ, हार, पुस्तक, मानपत्र सारं देतो... त्याला घेण्यासाठी दोनच हात असतात. एखादी गोष्ट प्रतीकात्मक देऊन सन्मान नाही का सूचित होत? अध्यक्षीय भाषण, आभार प्रदर्शन यांना फाटा देणं, ते सूचक करणं नाही का शक्य? प्रार्थना, स्वागतगीत, पसायदान या सर्वांना फाटा देऊन प्रारंभी राष्ट्रगीत म्हणून प्रत्येक कार्यक्रम धर्मनिरपेक्ष, राष्ट्रीय करणं नाही का शक्य? कार्यक्रम ठरावीक वेळेत पार पाडणं अशक्य आहे का? आपण केव्हा तरी सार्वजनिक जीवन शिस्त व संयम यावर आधारित करण्याकडे लक्ष द्यायला हवं.
 रस्त्यावरून वाहन चालविताना चालणा-याचा सन्मान करणं म्हणजे त्याला प्रथम जाऊ देणं, रस्ता ओलांडायला अवकाश देणं, अपघात होणार नाही अशी काळजी घेणं अशा गोष्टी आपल्या जबाबदार नागरिक असण्याच्या खुणा व्हायला हव्यात. हॉर्न न वाजवायची शिस्त बाळगून घेऊ त्या दिवशी ध्वनिप्रदूषण कमी होईल. वाहतुकीत संयमित दिवा, प्रकाश, वेग यांचे नियम पाळणं, ओळीची शिस्त मानणं, गाडी पुढे न दामटणं (ओव्हरटेक न करणं) हे सर्व कटाक्षाने पाळायला हवं. पोलिसांचा आदर करणंही आपण शिकायला हवं. जगात पोलिसाला 'हॅलो' केल्याशिवाय माणूस पुढे जात नाही; कारण तो आपल्यासाठी उभा आहे, याची खात्री असते. आपल्याकडे मंत्री येणार म्हणून जी सतर्कता दिसते, ती रोजच्या जीवनात का नाही असा आपण व्यवस्थेस प्रश्न करू तेव्हा येथील प्रशासन, व्यवस्था जनकेंद्री होईल. लोकशाहीत सरंजामी आपणास विसंगत वाटत नाही. त्यासाठीही नव्या जागृती व नव्या समाजशिक्षणाची गरज आहे.

 नागरी समाजभान (Civic sense) निर्माण झाल्याशिवाय जबाबदार कर्तव्यपरायण समाज (Civil society) आकारायला येत नसतो, हे आपण समजून घेतलं पाहिजे. भारतीय समाजाचं व्यक्तिकेंद्रित असणं हा आपल्या समाजजीवनातला जसा अडथळा आहे, तसं व्यक्ती पूजकताही व्यापक समाजहितापुढील एक मोठे आव्हान आहे. सामाजात सर्वोपरी अशी सार्वजनिक नैतिकता रुजवणं आणि ती क्रमाक्रमाने वाढवत नेण्यानेच आपले प्रश्न सुटायला मदत होणार आहे. न बोलता कृतिशील आदर्श आपण व्यक्तिशः पाळणे ही या देशातील भविष्यातील शांत क्रांती ठरेल. क्रांती सीतेच्या पावलासारखी चाहूल न देता येत राहायला हवी, तर ती चिरस्थायी बनते असं बाबा आमटे यांनी 'ज्वाला आणि फुले' मधील एका कवितेत म्हटलं

सामाजिक विकासवेध/५८