पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/5

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संबंध न राहणे, कृषी शिक्षण पदवीधरांचे शेतीत न जाता प्रशासकीय सेवेत जाणे, शेती संशोधनाचा सुमार दर्जा, शेती गुंतवणुकीतील वाढता खर्च (बी-बियाणे, खते, जंतुनाशके इ.) यामुळे शेतीपुढचे संकट रोज वाढते आहे. परिणामी येथील शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत.
 वर्तमान शिक्षणाचा प्रसार सपाट आहे. गुणवत्तेच्या निकषांचे आलेख आकाशस्पर्शी होताना दिसत नाहीत. आजवर आंतरराष्ट्रीय मानांकनात भारतीय शिक्षण संस्थांना मानाचे स्थान मिळविता आले नाही; कारण येथील विद्यापीठे पारंपरिक अभ्यासक्रमातून बाहेर पडू इच्छित नाहीत. शिक्षणातील संशोधन शिक्षकांच्या नोकरी व पदोन्नतीस पूरक असे स्वयंमोपयोगीच राहिल्याने समाजोपयोगी उत्पादक व कौशल्यधारी शिक्षणाची मुळे येथे रुजू शकलेली नाहीत. परिणामी युवक शिक्षित होताहेत हे जरी खरे असले तरी ते बेरोजगार राहतात. एकतर उद्योग, व्यापारासारखी धोका पत्करणारी क्षेत्रे निवडण्याविषयी युवकांचा निरुत्साह व नोकरदार होण्याची त्यांची मनीषा अशा दुहेरी पिछेहाटीमुळे वर्तमान काळातला तरुण भविष्यविषय स्वप्नरंजनात तरंगत राहतो. तो जीवनात तरतो असे सर्रास दिसत नाही. विवाहाचे वाढते वय, स्पर्धेच्या जगातील वाढता संघर्ष, नोकरीतील अशाश्वती यामुळे आजची तरुण पिढी क्षमता असून सुयोग्य शिक्षण व संधीअभावी निराश, निरुत्साही, तद्वतच तणावाखाली वाढते, जगते आहे. परिणामी अकाली प्रौढत्व व प्रौढ वयातच स्वेच्छानिवृत्ती अशांमुळे जीवनाच्या मोठ्या कर्तृत्वकाळातच ‘पुढे काय हे प्रश्नचिन्ह घेऊन जगण्याची नामुष्की यावी हे तिचे खरे शल्य व समस्या आहे.
 विवाह ही जातीयतेच्या विळख्यात अडकलेल्या आधुनिक भारताची समस्या नवा चेहरा घेऊन पुढे येत आहे. शिक्षित पिढी जागतिकरणाच्या खुल्या क्षितिजाचे जे जग पाहते ते जात, धर्म, पंथ, लिंग, वंश, भाषा, प्रांत भेदापलीकडील मुक्त जगाचे. येथील पालकांची पिढी अद्याप जात, धर्म मुक्त होऊ पाहत नाही. केवळ शिक्षित झालेली पिढी आधुनिक व पुरोगामी न झाल्याने उच्चशिक्षित मुला-मुलींपुढे आयुष्यावर गंभीर व दीर्घ परिणाम करणाच्या विवाहाचा निर्णय, विवाहस्वातंत्र्य, स्वयंवर मागणारी ही पिढी भावनिक नाते व भविष्यचिंता यांच्या संघर्षात स्व अस्तित्व गमावते आहे. त्यासाठी समाजजाणिवांमध्ये परिवर्तन ही नव्या शतकाची अनिवार्य गरज म्हणून पुढे येत आहे.
 जे प्रौढांचे, तेच मुलांचे. माहिती व तंत्रज्ञान क्रांतीने संगणक, टी. व्ही., मोबाईल्स इ. दृक्-श्राव्य साधनांमुळे मुलांचे भावविश्व उपजत