पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१०. पैसे देऊन सरकारी काम, योजना, अनुदान मंजुरी, गुन्हा माफी,मतदान, कर्जमंजुरी, कागदपत्रे, प्रमाणपत्र प्राप्ती, पदव्या, पुरस्कार हे आपले सर्वसाधारण चरित्र होते आहे. ते बदलणे तितकेच महत्त्वाचे आहे.
  सिंगापूरला जे भारतीय जातात, ते तिथे असेपर्यंत तेथील लोकजीवन अनुसरतात. इथे आले की इथले होतात. हा दोष व्यक्तिगत घडणीचा असतो. सार्वजनिक जीवन व वैयक्तिक जीवन यांत जितकी अद्वैतता येईल, तितके आपण लवकर प्रगती व विकासाकडे जाऊ. प्रत्येक प्रगतीला पैसे लागतात असे नाही. भौतिक विकासाला अर्थबळ लागते. चरित्रविकासाला विचाराचं रूपांतर कृतीत होणं आवश्यक असतो. समाज परिवर्तन समूह, झुंडीनं होतं हे खरं आहे; पण मूलभूत परिवर्तने ही वृत्ती विकासातूनच संभवतात. हे लक्षात घेऊन मी मूल्य व निष्ठांच्या पातळीवर अल्पसंख्य वर्गाचा प्रतिनिधी (जात, धर्म नव्हे, अपवाद या अर्थाने) असलो तरी मी त्याशी बांधील राहायला जोवर दृढप्रतिज्ञ होणार नाही, तोवर विकास, प्रगती, गुणात्मक वृद्धी या गोष्टी असंभवनीय, अशक्यच ठरतात.

◼◼

सामाजिक विकासवेध/३८