पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भारत : काही निरीक्षणे
 सिंगापूरसारखा देश, तेथील प्रगती, संस्कृती, शिस्त, कायदा व शांतता, शिक्षण, वाहतूक, सुविधा सार्वजनिक जीवन पाहत असताना मनात भारताची तुलना होत असते. त्यातून काही निरीक्षणे हाती येतात, ती अशी -
१. आपल्याकडे लोकसंख्या नियंत्रणाकडे अधिक लक्ष पुरविणे व सोई सवलतींचा संबंध अपत्यसंख्येशी जोडणे आवश्यक आहे. लोकसंख्या शिक्षण व प्रबोधनही तितकेच गरजेचे आहे.
२. आपण २00९ साली सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा आणला. अद्याप शाळाबाह्य मुला-मुलींची संख्या लक्षावधीच्या घरात आहे.
३. आपले दरडोई उत्पन्न कमी आहे.
४. आपल्या नागरिकांच्या मिळकतीतील मोठी रक्कम सण, समारंभ, देवधर्मसारख्या अनुत्पादक कार्यात खर्च होते. त्याचा परिणाम राहणीमान, शिक्षण, विकासावर होतो हे आपल्या लक्षात येत नाही.
५. समाजजीवनात कायद्याचे भय नाही. कायदे मोडणे, गुन्हे करणे यांना अप्रत्यक्ष राजकीय वदरहस्त मिळतो आहे.
६. समाज जीवनात वेळेचे पालन, रांग, कर भरणे, कर्ज भागविणे, शिस्त पाळणे या प्रतिष्ठेच्या व मूल्यवर्धक बाबी म्हणून त्याकडे पाहिलं जात नाही. शिक्षणातूनही ते परिणामकारकपणे बिंबवलं जात नाही.
७. स्त्री-पुरुष समानता, विज्ञाननिष्ठा, जातिधर्म निरपेक्षता व सहिष्णुता, बंधुता, स्वातंत्र्य ही मूल्ये भाषणात, चर्चेत ठळक असतात. कृतीत मात्र विसंगत व्यवहार असतो.
८. अध्यात्म, योग, अंधश्रद्धा, रूढी, बुवाबाजी यांना वाढत्या समृद्धीत मोठी जागा मिळते आहे. त्यात माध्यमांची भूमिका समर्थनाचीच दिसते. सन्मान्य अपवाद आहेत;
९. लोकांचं सामाजीकरण न होता राजकीय ध्रुवीकरण होताना दिसतं.

आपल्या लोकशाही व पंचायत राज्यव्यवस्थेत जबाबदारी, नकार, परत बोलावणे, निवडणूक बंदीसारखे उपाय प्रभावी करणे आवश्यक.

सामाजिक विकासवेध/३७