पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

९४ वा २०१२). देशातील ९६ टक्के लोक साक्षर आहेत. ७७ टक्के लोक चिनी, १३ टक्के मलेशियाई, भारतीय ९ टक्के, इतर ३टक्के आहेत. इंग्रजी, चिनी, मले व तमीळ तेथील राष्ट्रभाषा होत. धर्मस्वातंत्र्य आहे; पण धार्मिक एकात्मता अधिक महत्त्वाची मानली जाते. जगातील दळणवळण, दूरसंचार समृद्ध देश म्हणून सिंगापूरची ख्याती आहे. जगातील गतिमान विकसनशील देशांच्या श्रेणीत त्याचा अंतर्भाव होतो.
 सिंगापूरला मी गेल्या पंधरा वर्षांत तीनदा गेलो. एकदा भारताच्या शासकीय शिष्टमंडळातून, एकदा पर्यटक म्हणून आणि गेल्याच महिन्यात पाहुणा म्हणून. प्रत्येक वेळी मला नवं सिंगापूर पाहायला मिळालं. प्रत्येक वेळी मी सिंगापूरहून भारतात आलो की प्रचंड अस्वस्थ असतो. तो देश व आपला देश अशी तुलना करताना तर निराशाच पदरी येते.
जनजीवन
 सिंगापूरची माणसं चिनी अधिक; कारण ते मुळात चिनी लोकांचंच. ब्रिटिशांनी या देशावरही भारताप्रमाणेच राज्य केलं. सिंगापूर ब्रिटिशांची क्राऊन कॉलनी होती. व्यापार, उद्योग, नोकरीकरिता सिंगापूरमध्ये पहिल्यापासून मलेशियाई, भारतीय, थाई, फिलिपाई लोक येत राहिले. येणा-या प्रत्येकाला त्यांची संस्कृती, परंपरा, पोशाख, भाषा, भोजन, शिक्षण, धर्म पाळण्याचं स्वातंत्र्य राहिलं आहे. त्यामुळे इथे बहुविध संस्कृती आढळते. चर्च, मशीद, मंदिर, सिनॅगॉग इथे आहेत. चायना टाउन, लिटल इंडिया या नावांवरून असलेली उपनगरे म्हणजे त्या त्या देशवासियांच्या जुन्या वस्त्या, वसाहती; पण देश स्वतंत्र झाला. परदेशातून लोक मोठ्या प्रमाणात येऊ लागले. तशी त्यांनी नवी नगरविकास नीती अवलंबिली. राष्ट्रीय एकात्मतेचं धोरण त्यांनी अवलंबलं. तिथे शासकीय गृहनिर्माण योजना आहे. ते गृहनिर्माण मंडळ उत्पन्नगटांनुसार घरकुल उभारतं. पण प्रत्येक घरकुलात (अपार्टमेंट) मध्ये लोकसंख्येप्रमाणे घरे वितरित केली जातात. प्रत्येक घरकुल, वसाहतीमध्ये तुम्हाला सर्व देश, वंश, भाषांचे नागरिक लोकसंख्येच्या प्रमाणात दिसणार, असणार हे ठरलेलंच; त्यामुळे एकाधिकारातून निर्माण होणारे प्रश्न इथे नाहीत. म्हणजे मुंबई मराठी माणसाची, तर सुरत गुजराथ्यांचे असा प्रकार नाही. देशात दिवाळी, ख्रिसमस, ईद, बुद्धपौर्णिमा, लुनार न्यू इअर, सारे सण साजरे होतात. कधी धार्मिक तणाव नाही, हे विशेष.

 लोकजीवन अत्यंत शिस्तबद्ध व सुसंस्कृत, कुठेही दंगा, धोपा, गोंधळ, धावपळ, ढकलाढकली दिसणार नाही. प्रत्येक घरकुल, परिसर स्वच्छ,

सामाजिक विकासवेध/३३