पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कोरडवाहू प्रदेशातील शेतक-यांना आपण भविष्यकज्ञाळात देऊ शकू तर त्या प्रवण क्षेत्रातील शेतकरी आर्थिक सक्षम होतील. उत्पादनाबरोबर विपणन वा विक्रीत शेतक-यांचा सहभाग राहील तर वाढीस समृद्धीची झळाळी येईल व शेतक-यांच्या घरी लक्ष्मी व सरस्वतीची पावले उठायला साहाय्य झाल्याशिवाय राहणार नाही.
 शेतक-याची शाश्वत उन्नती व विकास हा शेतक-यांच्या आत्महत्येच्या शाश्वत मुक्तीमुळेच शक्य आहे, हे लक्षात घेऊन कृषी नियोजन, कृषी प्रशासन, कृषी संशोधन, कृषिपूरक उद्योग, कृषी विपणन यांची सांधेजोडच शेतक-यांना आत्महत्येतून सोडवू शकेल. अवकाळाचा फास सुकाळच सैल करील, माफी व सवलतींऐवजी उत्पन्नवाढ व बाजारभाव हमीकेंद्रित कृषी नियोजन महत्त्वाचे आहे. तसेच जमिनचा पोत निरंतर ठेवणे, खत व औषधांचा अतिरेक टाळणे, पीक पालट, बागायती व जिराईत पिकांचे संतुलन अशा सातत्यानेही शेतक-यांना आत्महत्येपासून परावृत्त करता येऊ शकते.
  शेतक-यांची पारंपरिक मानसिकतेतून मुक्ती हा शाश्वत उपायांपैकी महत्त्वाचा घटक होय. जात, धर्म, रूढी, परंपरा, अंधश्रद्धा यांच्या विळख्यातून बळी राजाची मुक्ती म्हणजे त्यास परंपरेचा निरंतर बळी होण्यातून वाचविणे होय. आळस, दैन्य, निराशा, दैवाधीनता या गोष्टी व्यसनाधीनतेइतक्याच गंभीर होत. त्यासाठी शेतक-यांच्या घरी ज्ञानदीप उजळत राहिले पाहिजेत. मुलगा शिक्षित झाला पाहिजे. तो 'साहेब' होण्यापेक्षा ‘प्रगतिशील शेतकरी होणे अधिक महत्त्वाचे. शेतकरी आपली मुलगी शेतक-यास देऊ इच्छित नाही, याचे कारण आर्थिक विपन्नताच आहे. हे चित्र बदलायचे तर शेतीचा कायापालट व शेतक-याचा कायाकल्प घडून यायला हवा, असं मी ‘शिवार संसद'सारख्या शेतकरी आत्महत्या निवारण संस्थेस शुभेच्छा देताना म्हटलं होतं. त्याची पुनरुक्ती करतो. अशा शेतकरी कुटुंबातील युवकांची चळवळच शेतक-यांच्या आत्महत्येच्या शाश्वत मुक्तीची हमी देईल, असा मला विश्वास वाटतो.

☐☐

सामाजिक विकासवेध/१३३