पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हे आपण समजू शकतो; पण निरंतर कर्जमाफीमुळे शेतक-यांचा कल दुष्काळाकडे वळणे यातच शेतक-याची खरी शोकांतिका आहे. दुष्काळ कोरडा असो वा ओला; प्रश्न आहे त्यावर मात करण्याची मानसिकता व आपत्ती व्यवस्थापन आपणाकडे हवे तितके सक्षम व मनोबल वाढविणारे नाही, ही वस्तुस्थिती आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एन.डी.आर.एफ.) पूर व अपघातात काम करते. दुष्काळात जेव्हा हे दल शेतक-यांच्या खांद्यास खांदा भिडवेल तेव्हा शेतकरी मनोधैर्याने दुष्काळाचा मुकाबला करण्यास तत्पर होईल. आपले राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छत्रसेना, प्रादेशिक सेना यांचे युवाबल शेतीत पाय ठेवू लागेल व शेतीक्षेत्रधारक स्वत: शेती कसू लागेल तेव्हा शेतीचे पडक्षेत्र कमी होऊन लाभक्षेत्रात वाढ होईल. त्यामुळे शेती उत्पादनाची दरडोई क्षमता व उत्पन्नही वाढेल.
 शेतक-यांच्या व्यसनाधीनतेचा मुद्दा नेहमी आत्महत्येसंदर्भात पुढे येतो. शेतकरी आत्महत्येत व्यसनाधीनतेचे प्रमाण १५ टक्के आहे. ते नगण्य नसले तरी त्याचा बाऊ करणे गैर आहे. कोरडवाहू शेतक-यांपेक्षा बागायती भागांत व्यसनाधीनता अधिक दिसते. त्यातही शेतीच्या अपयशामुळे व्यसनाचे प्रमाण अल्प आहे. हेपण लक्षात घ्यायला हवे. कर्जास कंटाळून येणारी व्यसनाधीनता अधिक गंभीर गोष्ट होय. निराशा, नाउमेद व्यसनाधीनतेस कारणीभूत होते आहे. वाड्या, वस्तीवर व रस्त्यांच्या दुतर्फा वाढणारे ढाबे, बीअर बार व एकंदर समाजाची चंगळ संस्कृती हे या व्यसनाधीनतेचे प्रमुख कारण होय.
  शेती फायद्याची करणारे पतपुरवठा, पाणीपुरवठा, वीजपुरवठा हे घटक होत. त्यांची हमी ना शाश्वती. मिळण्यातीदेखील आपणास शेतक-यांच्या आत्महत्येवर विजय मिळविता येणे शक्य आहे. जगात जिथे शेती किफायती ठरली त्या इस्त्रायल व जपानसारख्या देशांत झालेले प्रयत्न नि प्रयोग आपणासाठी अनुकरणीय आहेत. आपणाकडे शेतीस जोडणारे पूरक व्यवसाय व प्रक्रिया उद्योग यांच्या समन्वयाचा प्रयत्न होणे गरजेचे आहे. केवळ पिकांवर शेतकरी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणार नसेल तर पूरक उद्योगातून त्याची आर्थिक स्थिती सुधारेल, अशा उपाययोजना व्हायला हव्यात.

 अलीकडे शेतकरी पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात फळबागा, हरितगृहे, रोपवाटिका, नगदी पिके इत्यादी माध्यमांतून आर्थिकदृष्ट्या संपन्न होतो आहे. त्याचा मुख्य आधार पाणी आणि विज आहे. तरीही या भागात प्रक्रिया उद्योग फारसा फोफावलेला नाही. त्याची जोड मिळेल तर दरडोई उत्पन्नाबरोबर शेतीचे राष्ट्रीय उत्पन्न वाढेल. या प्रक्रिया उद्योगाचा फायदा

सामाजिक विकासवेध/१३२