पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बळिराजाच्या आत्महत्या मुक्तीचा शाश्वत विचार


 भारत हा शेतीप्रधान देश आहे. देशाचा विस्तार इतका की तो उपखंड ओळखला जातो. विस्तारामुळे या देशात हवामान, पीकपाणी, वनस्पती, पशु-पक्षी, मानवसंस्कृती, शेतीप्रकार इत्यादींचे वैविध्य आढळते. भूगोल म्हणाल तर देशात पठार, मैदानी, पर्वतीय, वाळवंट असं भूपृष्ठ वैविध्य आढळतं. शेतीचे जिराईत, बागायती, फळबागादी प्रकार आढळतात. शेतीपूरक मेंढपाळ, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय आढळतो. नव्या काळात मिश्रशेती, हरितगृहे, रोपवाटिका, वनशेती, सेंद्रिय शेती दिसते. शेतीस पाणी देण्याच्या पद्धतीत कालवे, पाटाकडून ठिबक आणि फवारणी (स्प्रिंकलर्स) कडे आपला प्रवास आहे. शेतक-याचे दरडोई क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत असले तरी देशाच्या एकूण शेती उत्पादनात वाढ होताना दिसते. धान्याची आयात कमी होऊन देश अन्नधान्याचा भविष्योपयोगी साठी करीपर्यंत स्वयंपूर्ण झाला आहे. धरणांकडून नदीजोड प्रकल्पांची स्वप्ने देश पाहू लागला आहे. शेतीमालाला हमीभाव मिळणे, शेतविकासार्थ पीकपाणी कर्ज, विमा, सवलत मिळते आहे. असे असूनही शेतकरी आत्महत्या का करतो, असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे.

 शेतकरी आत्महत्या हा देशाचा गहन प्रश्न असला तरी महाराष्ट्रापुरते बोलायचे तर या शतकाचा तो यक्षप्रश्न बनून पुढे आला आहे. साधारणपणे शेतक-यांच्या आत्महत्येचे सत्र शतकारंभी सुरू झाले. गतवर्षी तो आकडा विक्रमी होणे, हे भारतासारख्या शेतीप्रधान देशात चिंता नि चिंतनाचा विषय होणे स्वाभाविक आहे. देश दिवाळी साजरी करीत असताना तरी शेतक-याच्या जीवनाची होळी का होते, याचा विचार करणे आवश्यकच नाही तर अनिवार्य झाले आहे. गेल्या दोन वर्षांतील शेतक-यांच्या आत्महत्यांची आकडेवारी चक्रावून सोडणारी आहे. देशात एकूण पाच राज्ये अशी आहेत की जी शेतकरी आत्महत्याप्रवण मानली जातात. त्यात सन २०१४ साली

सामाजिक विकासवेध/१२८