पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पहा. मग तुमचा रक्तसंबंधांचा सारा अहंकार, सारी मिजास क्षणात उतरून जाईल.
 आश्रमातील आम्हा सर्व मुला-मुलींना काही लोक ‘नासक्या रक्ताची म्हणून हिणवत असायची. आम्ही ते आयुष्यभर लक्षात ठेवलं अन् पाहिलं की आपल्यामुळे कुणाचं, समाजाचं रक्त नासू नये. रक्तसंबंध हा संस्कार आज विषासारखा समाजात द्वेष पसरविताना मी अनुभवतो, तेव्हा अस्वस्थ होतो. ‘गर्व से कहो कि मैं हिंदू हैं, ‘त्या लांड्याची लुंगी धरा’, ‘परप्रांतीयांना हुसकावून लावा’, ‘काफिर को काट डालो’, ‘खळ्ळ खट्याक झाल्याशिवाय साल्यांना अक्कल येत नाही', 'अमूक-तमूक जातीचा वधू-वर मेळावा', ‘फलाण्या जातीची परिषद', 'क्रॉस आडवा करा' अशी वाक्ये मी वर्तमानपत्रात वाचतो तेव्हा लक्षात येते की अरे, हे तर सारं रक्तबीज जिवंत ठेवण्याचाच उपक्रम करताहेत. पूर्वी म्हणे रक्तबीज नावाचा एक राक्षस होता. एक वरदान घेऊन जन्मला होता. त्याच्या रक्ताचा थेंब कोण सांडेल तर त्या थेंबाचा पण रक्तबीज होईल. रक्तबीज अमर आहे. तो रक्तसंबंधातील नात्यांच्या थेंबाथेंबातून त्याला नष्ट करण्याचा एकच उपाय मला दिसतो. माणसानं सर्व प्रकारांच्या अहंकार, अस्मितांच्या कैफातून मुक्त होत माणुसकीचा गोफ गुंफावा. नाही तर नातेसंबंधांचा हा विषारी, विखारी गुंता सुटता सुटणार नाही. रक्तसंबंधांचा रक्तबीज जात, धर्म निरपेक्ष मनुष्य व्यवहाराने मरेल असा उ:शाप घेऊन आपण जगलो तरच खरे जगलो असे म्हणता येईल.

☐☐

सामाजिक विकासवेध/१२७