Jump to content

पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जसे महत्त्वाचे तसेच स्त्रीस माणूस म्हणून स्वीकारणे, पचवणेही! हुंडा, जात, धर्म, उच्चनीचता, लिंगभेद अजून भारतीय समाजमानसातून त्यांचे समूळ उच्चाटन होत नाही. राजकीय पक्ष कोत्या स्वार्थामागे आहेत. समाजास प्रगल्भ व्हायचे नाही. तो शिक्षित झाला तरी भ्रामक अहंकार, समजुतींचा शिकार आहे. देव, धर्म, दैव, चमत्कार यांतून तो अजून बाहेर पडत नाही, तोवर त्याचे प्रश्न सुटणार तरी कसे? आपले प्रश्न कोणी प्रेषित सोडवू शकत नाही. अपना हाथ जगन्नाथ' हेच खरे! हातावरच्या रेषा कष्टांनी उठाव्यात, ज्योतिषाचे भाकीत भ्रम, कुंडली म्हणजे अडाणीपणाचा चक्रव्यूह हे भारतीय समाज मानसाने एकदा लख्ख, स्वच्छ, स्पष्ट समजून घेऊन, खूणगाठ बांधून कामाला लागल्याशिवाय संकटमुक्ती नाही. कायद्याचं भय नाही नि मनाचं बंधन नाही, असा स्वैर समाज कोणता माणूसधर्म निर्मिणार?
 जोवर घरात माणसाला किंमत मिळणार नाही, तोवर बाहेर समाजात तो कसा प्रतिष्ठित होणार? त्यामुळे समाजबदलाचा प्रारंभ घराघरांतून, माणसांच्या मनामनांतून यायला हवा. नुसते शिक्षण नको, शहाणपण हवे. नुसते कौशल्य नको, जीवनात ते वापरण्याचा समजूतदारपणा हवा. नुसती श्रीमंती नको. मूल्य, संस्कार, संस्कृतीसह समृद्धी म्हणजे माणुसकीचं जगणं. पूर्वी ते खेड्यात होतं. आज ते तिथेही नाही. ही शोकांतिका दूर करायची तर चंगळवादी, भौतिक, उपभोगी वृत्तीचा त्याग करून 'मीच नाही, माझ्यासह सर्व' असा समूहभाव, सहजीवनभावच एकविसाव्या शतकात माणसास सुख, शांती, स्वास्थ्य प्रदान करील. शाश्वत जीवनाचा तोच एक मूलमंत्र आहे आणि महामार्गही!

सामाजिक विकासवेध/१२०