पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विकास निर्देशांकावर आधारित सामाजिक न्यायाची गरज


 भारिप-बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी अलीकडे ‘शाळेच्या दाखल्यावर फक्त धर्म व राष्ट्रीयता यांची नोंद करावी जातीचा उल्लेख काढून टाकावा', असे आवाहन केले आहे. आपली यासंबंधीची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी पुढे म्हटले आहे की ‘आजची तरुण पिढी जातीवर आधारित राष्ट्रीयत्व व निखळ राष्ट्रीयत्व अशा मानसिक संघर्षात सापडली आहे. त्यातून तिला बाहेर काढण्यासाठी आज कुठलीही व्यवस्था अस्तित्वात नाही. जुनी व्यवस्था तिला पुन्हःपुन्हा जातीच्या परिघातच ढकलण्याचा प्रयत्न करीत आहे.

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या ‘अॅनिहिलेशन ऑफ कास्ट या देऊ न शकलेल्या परंतु नंतर प्रकाशित झालेल्या भाषणात जातीच्या उच्चाटनाचे विस्तृत विश्लेषण व समर्थन केले आहे. त्यांच्या मतानुसार ‘जातीमुळे समाजाचे विघटन व नैतिक अध:पतन होते... जातीयतेने सामाजिकतेची जाणीव मरून गेली आहे... जातिविच्छेद म्हणजे मनोवृत्तीतील परिवर्तन... मनात जातीय वृत्ती रुजविणारा धर्म हाच याला जबाबदार आहे... खरे शत्रू जातिभेद पाळणारे लोक नसून त्यांना जातिभेद पाळावयास शिकवणारी शास्त्रे आहेत... लोकांची शास्त्रप्रामाण्यावरील श्रद्धा प्रथम नष्ट करणे हाच खरा उपाय आहे. बुद्ध व नानक यांच्याप्रमाणे ‘शास्त्रप्रामाण्य धुडकावले पाहिजे. हिंदू समाज हा जेव्हा जातिविहीन समाज बनेल, केवळ तेव्हाच त्याला त्याचे स्वत:चे संरक्षण करण्याइतपत सामर्थ्य प्राप्त होण्याची आशा करता येऊ शकेल. यासाठी त्यांनी सहभोजन व आंतरजातीय विवाहाचे समर्थन या भाषणात केल्याचे आढळते. हे भाषण १९३६ चे आहे.

सामाजिक विकासवेध/११