पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मानवमुक्तीचा मार्ग आहे. मला असं वाटतं की, धर्म आणि राष्ट्रीय एकात्मता आपणास जर ख-या अर्थाने अमलात आणायची असेल तर नेहरूंचं हे विधान आपलं जीवनध्येय बनायला हवं. भारतासारखा बहुसांस्कृतिक देश एकात्म बनायचा तर धर्म, जात, भाषा, प्रांत, वंश, परंपरांच्या पलीकडे जाऊन मानवधर्मी, भूतदयावादी, अहिंसक, सहिष्णू, समाजच या देशास एकसंध व एकसंघ बनविल.
 धर्मतत्त्व हे जर मानव नियंत्रणाचे साधन असेल तर सर्व धर्मात काही समान सदाचार अनुस्यूत आहेत. महात्मा गांधींनी ते शब्दबद्ध करीत असताना म्हटलं होतं की, “कामाशिवाय संपत्ती, विवेकाशिवाय समाधान, चारित्र्याशिवाय ज्ञान, नैतिकतेशिवाय व्यापारउदीम, मानवतेशिवाय विज्ञान, त्यागाशिवाय पूजा आणि तत्त्वाशिवाय राजकारण म्हणजे हिंसा आणि अधर्म होय." सत्य, अहिंसा, दया, प्रेम, करुणा, शांती कोणत्या धर्माने सांगितलेली नाही? आज विश्वसमुदाय अपघाती व प्रासंगिक युद्ध, हिंसा, अत्याचार, असहिष्णुता, जाळपोळ, हत्या, आक्रमण इत्यादींचा निषेध करीत असतो त्याचे मूळ सहअस्तित्वयुक्त बंधुभावी, समानशील विश्वनिर्मितीच्या स्वप्नात आहे. धर्म आज केवळ राष्ट्रीय एकात्मतेचा घटक नसून तो 'वसुधैव कुटुंबकम'चा पाया आहे. वर्ल्ड व्हिलेज'ची आजच्या माहिती व संपर्क युगाची कल्पना तरी काय आहे? भौतिक गतीप्रगतीपलीकडे आपणास बंधुभावयुक्त मनुष्यसमाज घडवायचा आहे. नवा धर्म म्हणजेच जय जगत्!

☐☐

सामाजिक विकासवेध/११५