धर्म आणि विश्व एकता
‘मनुष्य हा समाजशील प्राणी आहे' या व्याख्येत माणसाची उपजत समूह वृत्ती दडलेली आहे. समूहात राहणारे प्राणी, पक्षी अस्तित्वभयापोटी जसे समूहात राहतात, तसेच त्यांच्या जीवनाच्या असलेल्या अनेकानेक गरजा केवळ समूह जीवनामुळेच पूर्ण होत असतात. असे दिसून आलेले आहे की, सर्व देशांतील विविध संस्कृतींत पूर्वापर देव, धर्म या कल्पना कोणत्या ना कोणत्या रूपात अस्तित्वात होत्या. माणसाच्या निसर्गदत्त शक्ती, वृत्तीत लौकिक-अलौकिक, आत्मा-परमात्मा, इहलोक-परलोक, देव-दानव, पाप-पुण्य, नैतिक-अनैतिक, आस्तिक-नास्तिक, विज्ञानअध्यात्म, सत्य-असत्य, भ्रम-वास्तव या कल्पनांचा संघर्ष आहे. मनुष्य प्राचीनकाळी झंडीत राहत होता. गुंफेत वस्ती करीत असल्याच्या काळातील चित्र, शिल्पातही देव, धर्मविषयक संकल्पनांचे चित्रण आढळते. असुरक्षिततेपोटी माणूस अलौकिक शक्तीवर, चमत्कारांवर विश्वास ठेवून जगत आला आहे; पण जसजसा तो विकसित होत गेला, स्वावलंबी व स्वप्रज्ञ बनत गेला तसतसा त्याच्यावर असलेला अलौकिकाचा प्रभाव कमी होऊन तो इहवादी, विज्ञानी व बुद्धिवादी बनत गेला, हे नाकारता येणार नाही.
धर्माचा उगम माणसाच्या सश्रद्ध वृत्तीत आहे. धर्माचा मूळ उद्देश माणसास उन्नत करणे हाच असतो. भावना, इच्छा, ज्ञान अशा त्रिविध पद्धतींतून माणसाची घडण होत असते. पूर्वी जेव्हा त्याला स्वभान नव्हतं तेव्हा अलौकिकावर त्याचा विश्वास होता. भय, आश्चर्य, चमत्कार, विलक्षणता, शरणागती यांचं त्याच्यावर गारूड असायचं. यातून धर्मभावना त्याला मुक्ती द्यायची. म्हणजे जीवन पूर्ण, स्थिर, सुरक्षित करायला मदत करायची. त्यासाठी तो विविध कर्मकांडे करायचा; पण कालौघात त्याच्या