पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

धर्मनिरपेक्ष आहोत, याचा निर्वाळा व ग्वाही स्पष्ट शब्दांत द्यायला हवी व तशी प्रशासनिक प्रतिबद्धता कृतीतून प्रतिबिंबित व्हायला हवी. अशा घटनांत पंतप्रधानांचे मौन वा उशिरा प्रतिक्रिया देणे संशय निर्माण करणारे ठरते.
 अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांच्या प्रतिक्रियेनंतर सरकारचे स्पष्टीकरण येण्यापेक्षा देशातील बुद्धिजीवी, कलाकार, साहित्यिकांच्या निषेध व पुरस्कार वापसीची नोंद घेऊन जर सरकारने सहिष्णू असल्याची ग्वाही दिली असती तर ते अधिक विश्वासार्ह ठरले असते.
 सलमान रश्दी, एम. एफ. हुसेन, पेरूमल मुरुगन यांचे विस्थापन वा लेखकीय आत्महत्या कोणा एकाच पक्षाच्या कार्यकालातील नाहीत. राजकीय आणीबाणी जाहीर करणारे पक्षही स्वत: सहिष्णू म्हणून घेऊ शकत नाहीत. बाबरी मशीद, शहाबानो खटला अशा प्रसंगीही देशाने जे गैर आहे, त्याचा निषेध नोंदविला आहे.
 व्यक्तिशः मला भारतीय गणराज्याचा घटनात्मक बांधील नागरिक म्हणून हा देश सर्व जात, धर्म, पंथ, भाषा, प्रांत, संस्कृतीच्या समन्वयातून उभारणारा एकात्म देश व्हावा असे वाटते. जगात असे वैविध्य असलेले देश एकात्म राहून विकास करून दाखवीत असतील, तर आपण का नाही त्यांचा आदर्श ठेवायचा?

☐☐

सामाजिक विकासवेध/११०