पान:साथ (Sath).pdf/99

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्याच्याशी बोलायचे.
  राम ज्योतीला म्हणायचा, " तू त्यांना फारच सैल सोडतेस. आणि त्यांना पक्क माहीत झालंय की त्यांनी वाटेल ते केलं तरी तू खपवून घेशील म्हणून."
  " मी मुळीच वाटेल ते खपवून घेत नाही. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आपली त्यांच्याकडून अपेक्षा आणि त्यांची कुवत हयांच्यात काही तरी मेळ असला पाहिजे. ज्या माणसाची बुद्धी आणि कुवत सामान्य आहे त्याच्याकडून अतिशय उच्च दर्जाच्या कामाची अपेक्षा करायची नि मग त्याला ते जमलं नाही की त्याच्यावर आरडाओरडा करायचा ह्यात त्याचा तर फायदा नाही पण आपलाही नाही."
 रामच्या मते कामगारांशी मऊपणाने वागलं तर ते त्याचा गैरफायदा घेऊन चुकारपणा करतात. त्यानं पहिल्यापासून कामगारांशी कसं वागावं ह्याचे ज्योतीला धडे देण्याचा प्रयत्न केला होता.
 " त्यांच्याशी बरोबरीच्या नात्याने कधी वागू नये. तुम्ही त्यांचे वरिष्ठ आहात, त्यांच्यातले एक नाही असं त्यांच्या मनावर ठसलं पाहिजे. नाहीतर धंदा चालवणं शक्यच होणार नाही."
 तो असं बोलायला लागला की ज्योतीला तिच्या एका चुलतभावाची आठवण व्हायची. तो एका मालवाहू जहाजाचा कॅप्टन होता. एकदा तो म्हणाला, " समुद्रावर असलं की खूप वाचून होतं कारण गप्पा मारायला कुणी नसतं आणि फारसा काही उद्योग नसतो."
 तिनं विचारलं, " इतर ऑफिसर असतात ना?"
 "असतात, पण कॅप्टनला हाताखालच्या ऑफिसर्सशी फारसं मैत्रीनं वागून चालत नाही. एकदा बरोबरीचं नातं निर्माण झालं की मग तुमच्या ऑर्डर्स असं का म्हणून न विचारता तंतोतंत पाळण्याची काही गरज नाही असं त्यांना वाटायला लागतं. हयामुळे वादळाच्या किंवा इतर काही संकटाच्या वेळी धोका निर्माण होऊ शकतो."

साथ: ९१