कांबळेने आवंढा गिळून होकारार्थी मान हलवली.
" असं कसं ते करू शकतात ?”
“ जिल्हा परिषद त्यांना चार रुपये किलो देऊ करतेय.”
" जिल्हा परिषद त्यांना काय देऊ करतेय ह्याच्याशी मला काही कर्तव्य नाही. जिल्हा परिषद त्यांना शंभर रुपये देईल. पण त्यांनी माझ्याशी करार केला आहे. तो मोडून त्यांना दुसऱ्या कुणाला बी विकता येणार नाही."
" ते म्हणतात झेड. पी. देतेय तेवढी किंमत दिल्याशिवाय ते बी आपल्याला देणार नाहीत. मी त्यांना सांगितलं आम्ही तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू म्हणून. पण ते म्हणतात काय करायचं ते करा. आम्ही बी देणार नाही."
" यशवंतराव काय करतायत?"
" ते म्हणतात गावकरी जिद्दीला पेटलेत, त्यांचं ऐकण्याच्या मनःस्थितीत नाहीत."
" त्यांना इकडे घेऊन ये. आत्ताच्या आत्ता मोटरसायकल घेऊन जा न त्यांना त्याच्यावर घालून घेऊन ये."
"ठीक आहे, साहेब.”
राम रागाने नुसता धुमसत होता.
“साले हरामखोर! मी बघतो कसं माझं बी जिल्हा परिषदेला विकतात ते. कोर्टात खेचीन एकेकाला."
ज्योती म्हणाली, " सबंध गावाला काही तू कोर्टात खेचू शकत नाहीस."
"कोण म्हणतं ?"
"जिल्हा परिषद म्हणेल आम्ही कंपल्सरी प्रोक्युरमेंट केली म्हणून. त्यांना तसा अधिकार आहे."
"मी आव्हान देईन त्या अधिकाराला. त्यांना स्वत:ला बी तयार करायला शेकडो एकर जमीन पडलीय जिल्ह्यात. माझ्यासाठी तयार झालेलं बी घ्यायचं काही अडलंय का त्यांना ?"
" सरकार म्हटलं म्हणजे ते काहीही करू शकतात."
"सरकार जरी झालं तरी लोकशाहीत बेकायदा गोष्ट करू
साथ: ६५