पान:साथ (Sath).pdf/146

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 अमर गप्प होता. "तू हे पाहिल्यापासनं करीत होतास ? ह्यासाठीच तू ही नोकरी धरलीस का?"
 तरी अमर गप्पच होता.
  " तुला जावं लागेल हे तुला माहीतच आहे, कारण आता पुन्हा कधीच मी तुझ्यावर विश्वास टाकू शकणार नाही."
 राम हे अगदी अनिच्छेनं म्हणाला. अजूनही अमरला हाकलून देण्याची पाळी येऊ नये असं त्याला वाटत होतं. अजूनही अमरनं पश्चात्ताप व्यक्त केला असता, पुन्हा असं कधी होणार नाही, मला एकवेळ संधी द्या, असं काही म्हटलं असतं तर कदाचित रामने आपला निर्णय बदललाही असता. पण अमरने स्वतःचं समर्थनही केलं नाही की क्षमाही मागितली नाही. ज्योती हा सगळा वेळ काहीच बोलली नाही. ती नुसती त्याच्याकडे विषण्णपणे पहात होती. त्याला अपराधी वाटत असलं पाहिजे कारण तो तिच्या डोळ्याला डोळा देत नव्हता.
 राम नंतर म्हणाला, " त्याला पैशाचीच जरूर होती तर माझ्याकडे मागायचे होते. मी त्याला उसने दिले असते. बक्षीससुद्धा दिले असते. मुलासारखा वागवला मी त्याला. आपल्याला त्याच्याबद्दल किती वाटतं हे काय त्याला कळलं नसेल ? पुढच आयुष्य, आपल्याशी नातं हया सगळ्याची नासाडी होईल अस कृत्य त्यानं केलंच कसं ? की आपल्याबद्दल त्याला काही वाटतच नव्हतं ? सगळा देखावाच होता?"
 त्याची वेदना ज्योतीला कळत होती. त्याला तिच्यापेक्षाहा जास्त दुःख झालं असलं पाहिजे. कारण तो कधी कुणाला आपल्या जवळ येऊ देत नसे. ह्या एका बाबतीत त्याने अपवाद केला होता आणि त्याची परिणती ही अशी झाली होती. हा घाव खूप खोलवर लागला असला पाहिजे.
 ती म्हणाली, " चांगल्याबरोबर वाईटाचाही स्वीकार करावा लागतो आयुष्यात."
 " मी पुन्हा कधी कोणावरही विश्वास टाकणार नाही."
 "एका माणसाने तुझा विश्वासघात केला म्हणून तू सबंध

१३८: साथ