पान:साथ (Sath).pdf/130

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 " हो, आणि आजी आवडते मला. ती सगळीच आवडतात. कशी साधी – सरळ माणसं आहेत. जशी आहेत तशी वागतात. आत एक बाहेर एक नाही. खरीखुरी माणसं.”
 “ आणि मी आणि राम सरळ नाहीयोंत असंच ना?"
 " मी कुठे तसं म्हटलं ? मी तुझ्याबद्दल आणि डॅडींबद्दल काही बोललेच नव्हते. तुला माझ्या बोलण्यातून नेहमी वाकडा अर्थच सापडतो."
 " पण ह्यावेळी तो अर्थ तू ध्वनित केला होतास. हो की नाही ? खरं सांग स्मिता. तू सच्चेपणा, प्रामाणिकपणाबद्दल एवढं अवडंबर माजवतेस. मग ह्या एका वेळेला तरी तू खरं बोल."
 स्मिता फक्त खांदे उडवून गप्प बसली होती. तिचं हे नेहमीचंच होतं. प्रताप वाद घालायचा, भांडायचा म्हणून ज्योतीला त्याचा राग यायचा. पण त्याला तोंड देणं सोपं होतं. जो भांडतो त्याच्याशी भांडता येतं. जो बिनबोलता तुम्हाला गुन्हेगार ठरवून गुन्हयाची शिक्षाही फर्मावतो त्याच्याशी भांडण कसं करायचं ? तू काहीही म्हण वा कर, माझं मत तू बदल शकणार नाहीस असाच तिच्या वागण्याचा अर्थ असे. ती एखादंच वाक्य अधनंमधनं असं काही बोलायची की त्यातनं तिच्या मनातला विखार व्यक्त व्हायचा. पण ते वाक्य पकडून तिच्याशी वाद घालायला लागलं किंवा तिचं बोलणं तर्कदुष्ट किंवा विसंगत असल्याचं माप तिच्या पदरात घालायला लागलं की ती माघार घेतल्यासारखं करून गप्प बसे. प्रत्यक्षात ती माघार नसेच कारण माघार घेणं तिच्या स्वभावात नव्हतं.
 ज्योती तिच्या नव्या आयुष्यात आकठ बुडाली आणि तिची आई म्हणाली ते खरं ठरल. तिला आईकडे जायला सहासहा महिन्यात वेळ होईना. आणि हे फक्त कामामुळेच असं नव्हे. तिला एखाद्या वावटळीत सापडल्यासारखं झालं. पुष्कळ दिवसांनी मागचा विचार करताना तिला उमगलं की वावटळीत सापडलेली ती एकटीच होती. रामने मनात बनवलेल्या आराखड्यानुसारच विचारपूर्वक पावलं टाकली होती.

१२२ : साथ