पान:साथ (Sath).pdf/124

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

की ती चट सूवळ येतात."
 पण कधी कधी त्याच्या डोळ्याला डोळा देताना ज्योतीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं असल्यासारखं वाटायचं. कधी शांत बसला असला तर तो इतर मुलांसारखा आनंदी दिसायचा नाही. मग तिला अपराधाचा उमाळा यायचा. तिला अपराधी वाटतं हे प्रतापला उमजत असलं पाहिजे कारण तो फार लवकर त्याचा फायदा घ्यायला शिकला. एरवी ज्या वयात तिनं त्याला दिल्या नसत्या त्या मनगटी घड्याळ, छोटा ट्रॅन्झिस्टर रेडिओ, कॅमेरा असल्या गोष्टी तो मागण्याचा अवकाश की ती त्याला द्यायची. त्याही रामच्या नकळत. तिला समजत होतं की असं करणं चूक आहे, कारण ते करूनसुद्धा तिची अपराधी भावना नाहीशी होत नव्हतीच. तिला कळत होतं की प्रतापला जे तिच्याकडून मिळत नव्हतं त्याची भरपाई घड्याळ आणि कॅमेऱ्याने होण्यासारखी नव्हती.
 राम म्हणायचा, “ मूल झालं म्हणजे दिवसाचे चोवीस तास त्याच्याच तैनातीत घालवले पाहिजेत असं कुणी सांगितलंय ! मुलं हा आपल्या आयुष्याचा फक्त एक भाग आहे, आपलं सबंध आयुष्यच त्यांना व्यापू दिलं तर काय राहिलं ?"
 प्रत्येक मूल वेगळं असतं, त्याची भावनिक गरज वेगळी असते हे रामने कधी समजून घेतलं नाही. पुष्कळ गोष्टी अशा होत्या की त्या त्याने समजून घेतल्या नाहीत. तो आणि मुलं ह्यांच्यात तिची किती ओढाताण व्हायची हे त्याला कधी कळलं की नाही ह्याची तिला शंका होती. कितीदा तरी तिनं त्याच्या नकळत गपचूप अश्रू ढाळले होते, कारण समजा तिला रडताना त्यान पाहिलं असतं तर त्याला पटेल असं रडण्याचं कारण देण शक्य नव्हतं. तो तिच्या विसाव्याचं ठिकाण बनू शकत नव्हता कारण तिचं दु:ख तो जाणू शकत नव्हता. तिच्या मनात आलं, दोघांच्यातला हा अडसर दूर करून त्याला आपल्या वेदनेची जाणीव करून दिली नाही हे चुकलं का ?
 तिनं सुस्कारा टाकला. दोषाचं असं वाटप करता आलं असतं

११६ : साथ