पान:संमेलनाध्यक्ष बडोदा यांचे भाषण (91 ve Marathi Sahitya Sammelan Speech).pdf/16

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

करताना दिसतं. त्यात विचारासोबत आत्मनिष्ठ कलात्मकता असते, त्यामुळे त्याचा प्रभाव अधिक सूक्ष्म व प्रभावी पड़तो.
 मागच्या वर्षी दिवंगत झालेले हिंदीचे एक श्रेष्ठ कवी चंद्रकांत देवतालेंनी एका मुलाखतीत असं म्हणलं आहे की, ‘कवीनं सदैव आपल्या लोकांसोबत राहिलं पाहिजे. करोडो लोकांच्या दु:खात कवीनं आपल्या कवितेच्या माध्यमातून सामील व्हावं. कवी कुठेही असू दे, भले त्याचं लोक कमी वाचत असतील, पण ते त्याचं कवी असण्याचे भागधेय आहे, नियती आहे, जी त्याला लोकांच्या दु:खात सहभागी व्हायला, त्यांच्या शोषणाविरुद्ध आवाज उठवायला मजबूर करते. कवीची भूमिका आजच्या परिस्थितीत मला विचाराल तर कवितेच्या बाहेर (म्हणजेच समाजात) अधिक असली पाहिजे. ही भूमिका त्याची शक्ती असते, जिच्या आधारे तो आपलं मस्तक झुकवणार नाही, हिमतीनं उभा राहीन व स्पष्टपणे (व्यवस्थेला - शोषणाला) 'नाही-नाही' म्हणेल.' (स्वैर भावानुवाद)
 अभिजनवादी व शुद्ध कलावादी साहित्यकारांनी प्रगतिशील लेखक चळवळीच्या विचारधारेला डावी विचारसरणी मानले व प्रचारकी साहित्याला प्रतिष्ठा देते, म्हणून विरोध केला; पण प्रश्न येथे विचारधारेपेक्षाही माणसांच्या दु:ख व शोषणचा आहे आणि असतो. मूलत: लेखक हा मानवी दु:खाचीच कहाणी सांगत असतो. कारण त्याचं नातं हे दु:खाशी व वेदनेशी असतं. स्वातंत्र्य, समता आणि बधुता हे भारतीय संविधानाचं तत्त्वज्ञान आहे, ते साहित्याचे पण असलं पाहिजे. कारण माणूस महत्त्वाचा, त्याचं जगणं; ते ही सन्मानानं जगणं महत्त्वाचं आहे; पण देश कोणताही असो, तेथील व्यवस्था मग ती धर्माची असो, विचारसरणीची असो, शासन-प्रशासनाची असो किंवा अर्थकारण संस्कृतीची असो, ती मूठभर माणसांच्या हाती सत्ता केंद्रित करत जाते, हा सार्वत्रिक इतिहास आहे. त्यामुळे बहुसंख्य सामान्य माणसांना ही व्यवस्था पुरेसा न्याय देत नाही, उलटपक्षी त्याचं शोषण करते व त्यांना मानवी प्रतिष्ठा व सन्मानाचं जगणं नाकारते.... हेच मानवी दु:ख, वेदना आणि दबलेपणाचं - पिचलेपणाचं मूळ आहे. त्याला आवाज देणे, ते शब्दबद्ध करणे, हेच तर साहित्याचे सामाजिक प्रयोजन आहे. असेच विचार नोबेल पारितोषिक स्वीकारताना विल्यम फॉकनॉर यांनी काढले होते, ते खालीलप्रमाणे आहेत.

 "मी मानवजातीचा शेवट जवळ आलाय हे मान्य करायला तयार नाही. कारण मानवजात ही अमर आहे. तसेच माणूस द:ख आणि वेदना सहन करीत आणि त्यावर मात करीत जगतो व वाटचाल करतो. याचे कारण त्याला मन आहे, आत्मा आहे. त्याच्यात अपार सहनशक्ती आहे. त्याच्यात करुणा व त्यागाची भावना आहे. त्यामुळे लेखक-कवींचे माझ्या मते हे कर्तव्य आहे, नव्हे त्यांच्या वाङ्मयीन धर्म

लक्ष्मीकांत देशमुख यांचे अध्यक्षीय भाषण / १३