पान:संमेलनाध्यक्ष बडोदा यांचे भाषण (91 ve Marathi Sahitya Sammelan Speech).pdf/13

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

निकोप कुतूहल लेखक म्हणून आहे. ते जाणून च समजून घेत मी आजच्या माणसासाठी लिहीत असतो.
 पण याचा अर्थ असा नाही की, समकालीन लेखन हे क्षणजीवी असतं, मौलिक नसतं. कारण मानवी भाव-भावना, माणसाचे षडरिपू विकार हे सार्वत्रिक व कालातीत म्हणून एक अर्थाने सनातन आहेत. म्हणून आजचं समकालीन लेखन हे क्षणजीवी असेल असं समजायचं कारण नाही. ते उद्या पण समकालीन वाटू शकेल, जर परिस्थिती व मानवी भावना-संस्कृतीत बदल झाला नाही तर, आणखी एक बाब लक्षात घेतली पाहिजे ती ही की, माणूस हा मर्त्य आहे आणि मला जीवनाचे क्षणभंगुरत्व व मर्त्यपणा मान्य आहे. हा न्याय माझ्या लेखनालाही लागत असेल, तर मला वाईट वाटायचं कारण नाही.
 मला आज या सर्वांत महत्त्वाच्या विचारपीठ व साहित्य मंचावरून अभिमानाने सांगू द्या की, मी ‘प्रेमचंद' परंपरेचा पाईक आहे. एकनिष्ठ वारकरी आहे. प्रेमचंद हे भारताचे सर्वांत मोठे लेखक होते व आहेत. ते ज्या साहित्य विचारांचे प्रतिनिधित्व करतात, ती साहित्य विचारधारा म्हणजे प्रगतिशील लेखक चळवळीची विचारधारा होय! तिचे तत्त्वज्ञान काय आहे, हे सांगण्यापूर्वी १९३६ साली लखनौ येथे ‘अखिल भारतीय प्रगतिशील साहित्य चळवळी'चे जे पहिले अधिवेशन भरले होते, त्याच्या अध्यक्षपदावरून प्रेमचंदांनी 'साहित्य का उद्देश' या बाबत जे विचार व्यक्त केले ते आजही ताजे व प्रासंगिक आहेत. ते म्हणाले होते,
 ‘जर लेखकाला उन्हात कष्ट करून दुपारी झाडाखाली विसावलेल्या शेतकरी व मजुरांच्या रापलेल्या व काळवंडलेल्या चेहऱ्याच्या सुरकुत्यांमधलं सौंदर्य आणि राबराब राबणाच्या कष्टकरी स्त्रीच्या राठ पडलेल्या हातामधील सौंदर्य जाणवत नसेल तर तुम्ही लेखक म्हणून घ्यायला पात्र नाहीत.'

 कदाचित प्रेमचंदांचे परखड विचार रूपवादी, कलावादी लेखक कवींना मान्य होणार नाहीत, तेव्हाही मान्य नव्हते; पण साहित्याचा तो एक महत्त्वाचा विचार आहे आणि त्याचे महत्त्व आज ऐंशी वर्षांनी पण कायम आहे, असं प्रेमचंदांच्या परंपरेचा स्वत:ला पाईक म्हणवून घेण्यात धन्यता मानणाऱ्या मला वाटतं. त्यांनी त्या भाषणात असे प्रतिपादन केलं होतं की, साहित्यामध्ये वैयक्तिक अनुभवापेक्षा समाजाचे अनुभव, त्यांचे प्रश्न अधिक महत्त्वाचे. कारण लेखक हा केवळ व्यक्ती नसतो, तर तो समाजाचा घटक असतो. त्याचे अवघे अस्तित्वच मुळी समाजावर अवलंबून असते. समाजाविना प्रत्येक माणूस एकेकटा शून्य आहे. त्यामुळे सुशिक्षित व भाषाप्रभू असलेल्यांची समाजाप्रती काही एक जबाबदारी असते. ज्याप्रमाणे कामगारांच्या श्रमावर व शोषणावर जगणा-या भांडवलदाराचा आपण निषेध करतो, त्याचप्रमाणे सुस्थितीमधील लेखक जर केवळ स्वत:च्या वैयक्तिक सुख-दु:खात

१० / ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन