पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/70

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सप्रेम नमस्कार

पुढे काय ? हा प्रश्न आपल्याला पडला आहे तसाच तो मलाही गेले ४-६ महिने फार सतावतो आहे. गेल्या दिवाळीला आपण विहिरीचे काम सुरू केले. नाताळात विद्यार्थ्यांचे श्रमशिबिर घेतले. त्यानंतर महिनाभर विहिरीचे काम जोमाने सुरळीत चालू राहिले. जानेवारीच्या मध्यापासून मात्र हळूहळू खंड पडू लागला. निवडणुका हे एक कारण. दुसरे कारण बाहेरच्या व आपण देत असलेल्या मजुरीतील तफावत. बाहेरचे दर वाढले होते व सहाजिकच माणसे आपल्याकडे येईनाशी झाली. असे घडू नये, मजुरांनी बाहेरच्या आकर्षणामुळे विहिरीचे काम अर्धवट टाकून जाऊ नये म्हणून आपण काळजी घेतली होती. सुरुवातीलाच वाढते दर दिले होते व चार महिन्यात, बाहेरचे दर कमीजास्त झाले तरी, यात कुठलाही बदल होणार नाही, कोणी काम सोडून जाता कामा नये, हे चार वडील मंडळींच्या देखतच स्पष्ट केले होते. पाडव्याच्या दिवशीची, वाडीवरची ती सकाळची बैठक. त्यातल्या वाटाघाटी, ती घासाघीस अजूनही माझ्या चांगली स्मरणात आहे. तात्याबासारखे काही थोडे आपला शब्द पाळणारे होते; पण बरेचसे दोन-चार आण्यासाठी दुसरीकड जाऊ लागले. त्यात पुन्हा आपली अपेक्षा होती तेवढे पाणी लागणार की नाही, याचीही शंका उत्पन्न झाली. या अनिश्चिततेत पुढचे आणखी १-२ महिने गेले. मग आल्या जिल्हापरिषदेच्या निवडणुका. आपल्या कामाचा विपर्यास होऊ नये म्हणून या निवडणुकीच्या गडबडीत तर आपण मुद्दामच स्वस्थ रहाण्याचे ठरवले. शेवटी हीही गडबड संपली. तुम्ही मोकळे झालात आणि पाण्यानेही आशा दाखवली. पुन्हा माणसे जमू लागली, काम मागू लागली. पण या वेळी लिमये जलसंशोधकांनी आपल्याला पाण्याचा निश्चित अंदाज दिला असल्याने आपण सावध होतो. पुन्हा काम सुरू करण्यापूर्वी थोडी मोजमापे आता घेऊन झाली आहेत. उन्हाळी बागायत काही या विहिरीवर तूर्तच्या परिस्थितीत होऊ शकणार नाही. पण दुष्काळ हटण्याला मदत निश्चित होणार. पिके, शेवटच्या एक-दोन पावसांनी तोंड न पाखवल्यामुळे जी हातची जातात, ती वाचणार. आजवर ओसाड पडलेल्या जमिनीत चार दाणे येणार एवढी शाश्वती आज निर्माण झाली आहे. यापेक्षा अधिक त्या भागात सुरुवातीलाच होणे अवघड आहे. सगळा भाग दुष्काळी. आहेत त्याच विहिरींना बारमाही पाणी नाही. तास-दोन तास मोटा जेमतेम चालतात. मग जापल्याच विहिरीला खूप पाणी लागणार तरी कसे ? त्यासाठी ओहोळ अडवून काही ठिकाणी बंधारे बांधण्याचे काम हाती घ्यायला हवे, तर सर्वच विहिरीतील याची उंची थोडीफार वाढेल. जमिनीचा ओलसरपणाही टिकेल. पण आज हे आपल्या कक्षेच्या बाहेर आहे. पहिल्या विहिरीवरील काम आता आटोपते घेऊन आपण दुसऱ्या विहिरीच्या तयारीला लागणे चांगले. बांधबंधाऱ्यांच्या कामा

| ६३ |