पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/27

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

एकनाथरावांनी आपल्या ११ एकर जमिनीपैकी ३-४ एकर जमीनी यात गुंतवली आहे.

अंतराने जवळ, पण गुणाने फार फार दूर असणारे शेजारचे आर्वी गाव पाहिले म्हणजे एकनाथरावांची खरी योग्यता ध्यानात येते. पानमळ्यासाठी साऱ्या महाराष्ट्रात महशूर असणारे आर्वी गाव. पैशाने समृद्ध. पण शिक्षण नाही; श्रमदान नाही; सहकार नाही. नागझरीसारखे काहीही नाही. आहेत फक्त भांडणे, व्यसने आणि स्वार्थ. पार मागासलेले. नागझरी सामाजिकदृष्ट्या फार पुढे गेले; आणि पैशाने पुढारलेले आर्वी अद्याप जुन्या वातावरणातच खितपत आहे.

एकनाथरावांचे आदर्श कोणी गांधी नेहरू नाहीत. ते आहेत त्यांच्याच चुलत घराण्यातील एक दिवंगत दानशूर पूर्वज, नागझरीतले कै. धोंडीराम पाटलोजी भोसले. यांनी फार वर्षांपूर्वी नागझरी सोडले व मुंबईत फोर्टमध्ये खोक्याचा एक कारखाना काढला. सुदैवाने धंद्यात बरकत आली. पण कै. धोंडीराम नागझरीला विसरले नाहीत. आपल्या गावातील अनेक माणसांना त्यांनी कारखान्यात उद्योग तर दिलाच, पण हळू हळू त्यांचेमार्फत गावच्या विकासाच्या एकेक गरजाही पूर्ण करण्याचा क्रम ठेवला. रयत शिक्षण संस्थेस कै. धोंडीराम भोसले यांच्याकडून अनेक देणग्या मिळालेल्या आहेत. हा घराण्याचा वारसा घेऊन आमचे नाथ भोसले ५०-५१ पासून गावच्या विकासासाठी उभे राहिले आणि गेल्या दहा-बारा वर्षात त्यांनी स्वार्थ आणि परार्थ यांचा योग्य मेळ घालून विकासाचा एक नवा आदर्श सर्वांसमोर ठवला.

*

। २० ।