पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/24

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वास्तविक ‘लग्नातला हुंडा' व ' आपण' यांचा परस्पर संबंध काय ? पण पांचगणीला हेडमास्तर असताना आपण तरुण कार्यकर्त्याचे एक मंडळ स्थापन करून त्या भागात हुंडा-प्रतिबंधक चळवळ चालू केलीत असे मी एका ठिकाणी वाचले. काम दिसले की उडी ठोकायची हा आपला देहस्वभावच होऊन बसला आहे.

उत्तर सातारा प्राथमिक शिक्षक बँकेचा कारभार तिच्या अत्यंत आणीबाणीच्या काळात आपण १९५० साली हाती घेतलात आणि पाच वर्षात आपल्या चोख धोरणाने व तळमळीच्या कार्याने ती बँक पूर्ण सुस्थिर पायावर उभी करून दाखवलीत. सारे शिक्षक या कार्याबद्दल आपल्याला मनापासून दुवा देत आहेत. लाकूडकाम किंवा सूतकताई यापेक्षा शेती हा मूलोद्योग प्राथमिक शाळेसाठी अधिक उपयुक्त आहे हे मत आता शिक्षणक्षेत्रात सर्वमान्य होत आहे. पण शाळेसाठी एवढ्या जमिनी आणायच्या कोठून, हा प्रश्न प्रत्यक्ष सरकारलाही मोठा अवघड भासत आहे. परंतु आपण 'शाळेसाठी भूदान' ही चळवळ हाती घेतल्यामुळे आज साताऱ्यातील ६०० शाळांना सुमारे १०००-१२०० एकर जमिनी मिळून त्या शेतीबेसिक होण्याच्या मार्गावर आहेत. यातील दोन-तृतीयांश कार्य केवळ आपले एकट्याचे आहे, हा आपल्या कर्तृत्वशक्तीचा केवढा रोकडा पुरावा आहे ? साक्षरताप्रसार चळवळ तर सातारा जिल्ह्यात प्रथम आपणच उचलून धरलीत. चालू गावशिक्षणमोहिमेतील आपले श्रम व कार्य केवळ अमाप आहे. वाईट इतकेच वाटते की, दरखेपेस आपण केवळ श्रमाचे धनी होता ; यशाचे वाटेकरी होण्याचे भाग्य आपल्याला क्वचितच लाभते.

कदाचित या कटु वस्तुस्थितीची खंत आपल्याला वाटत असेल वा नसेलही. पण माझ्यासारख्या आपल्या दूरच्या मित्राला ती जरूर वाटते. माझ्या मते याचे कारण एकच आहे ; ते म्हणजे आपण अनेक व्याप मागे लावून घेता हेच. शिक्षक बँक, बालवीर चळवळ, साक्षरता प्रसार, शाळेसाठी भूदान, मध्येच काँग्रेसचे राजकारण, भाग-शिक्षणाधिकाऱ्याची नोकरी, शिवाय किरकोळ कामे एवढ्या गोष्टी एकाच माणसाने हाताळणे चूकच आहे. यामुळे सगळीकडे आहे आणि कुठेच नाही अशी आपली अवस्था होऊन बसते. प्राथमिक कष्टाचे कामच आपल्या वाट्यास येते ते याचमुळे. यापेक्षा एखादे क्षेत्र निश्चित करून

ग्रा...२

। १७ ।