पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/183

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

झाल्यावर ती कशी जीवहीन झाली, याचे उदासवाणे चित्रण आहे. फैजपूरला १९३६ साली काँग्रेसचे अधिवेशन भरले होते. हे आमचे पंढरपूर' असा फैजपूरचा उल्लेख कै. ना. बाळासाहेब खेरांनी नंतर केला होता. कारण फैजपूरची काँग्रेस ही ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या पाठिंब्याने व मदतीनेच भरलेली काँग्रेस होती. त्या फैजपूरचे सामाजिक व आर्थिक चित्र आज काय आहे आणि सगळेच कसे निराशजनक आहे, याचे तपशीलवार अभ्यासावर आधारलेले वर्णन ‘एका गावचा स्वातंत्र्यकाळातील वाटचाल' या लेखात आहे. 'लोकशाही विकेंद्रीकरण-एक विचार' या लेखात महाराष्ट्रातील पंचायतीराज्यप्रयोगाच्या सुरुवातीलाच माजगावकरांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. आज पुणे, मुंबई इत्यादी महानगरपालिकांच्या हाती सत्ता आहे. गेल्या १०-१५ वर्षांत या नगरपालिकांनी कोणत्या नव्या नेतृत्वाला जन्म दिला ? सामाजिक व नागरिक नीतीचे कोणते नवीन वळण लावले ? २६ जिल्ह्यांच्या जिल्हापरिषदा म्हणजे सव्वीस नव्या नगरपालिका होणार नाहीत काय? माजगावकरांच्या त्या वेळच्या शंका फारशा अनाठाया नव्हत्या हे आज बारा वर्षांनी दिसतच आहे. ' पोचमपल्लीकडे ' या लेखात माजगावकरांच्या भ्रमंतीचे व ग्रामीण दुःस्थितीतून त्यांच्या मनात निर्माण झालेल्या विचारांचे वर्णन आहे. एक खोपट आहे आणि त्यात ट्रान्झिस्टर आहे, एका बाजूला लक्तरे आहेत आणि दुसऱ्या बाजूला घड्याळ आहे, शिक्षण आहे पण त्याचा वातावरणावर प्रभाव नाही, ही आयात करून चिकटवलेली समृद्धी आहे, नवीन चित्र जे निर्माण होत आहे त्यात सलगपणा नाही, इत्यादी. यातून त्यांना असे वाटते का खरी गरज जर असेल तर ती एका ' समग्र आचारविचार दर्शनाची.' विचारवतांनी हे केलेले नाही, त्यांनीही बेगडी आयातच केली, असा दोष माजगावकर त्यांना देतात व अशा प्रकारच्या चिंतनात लेख संपवतात. 'जाग' या लेखात गोदाराणीने ठाणे जिल्ह्यात उभ्या केलेल्या लाल बावट्याच्या बंडाचे वर्णन आहे आणि त्याचबरोबर विधायक कार्याला तुच्छ लेखणाऱ्या व ह्या जागृतीचा रचनात्मक उपयोग करून घेण्याची संधी दवडणाऱ्या साम्यवाद्यांचा अधिक्षेप आहे. सर्वच लेखांचा असा परिचय करून देणे शक्य नाही. एवढं म्हटलं तर पुरे आहे का, या पुस्तकात माजगावकरांनीच मागे काढलेल्या अन्नस्वतंत्रता-मोर्चाचे वर्णन आणि उल्लेख आहेत आणि अन्नस्वावलंबित्वाच्या तत्त्वावर माजगावकरांची जी ठाम श्रद्धा आहे तिचे पडसाद आहेत. ग्रामीण भागातीला दरिद्रय आणि हीन, शोषित जीवन यांची बोलकी चित्रे आहेत. जमीनकबजा आंदोलन, ग्रामस्वराज्याची कल्पना सहकारी संस्थांची दुरावस्था, मिशनरी संस्थाचे मदतीचे पण माजगावकराना कावेबाज वाटणारे प्रयोग, कूळकायद्याची फलश्रुती यांवरचे विचार आहेत.

 पण या पुस्तकाचे एवढे चित्र पुढे ठेवले तर अपुरे होईल. दिलासा देणाऱ्याही काही गोष्टी आहेत. मुख्यतः ग्रामीण भागातील कार्यकर्ते आहेत. यात रणरणत्या

। १७६ ।