पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/172

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रिय X X X भाई

सेवाग्राम आश्रमातील अंतर्गत मतभेदांविषयी मी मौन पाळण्याचे ठरविले होते. पण मित्रांनी आग्रह करून मला लिहायला प्रवृत्त केले. शिवाय काम अर्धवट सोडून मीच आश्रमाच्या शेतीचे हजारो रूपयांचे नुकसान केले, असा माझ्यासंबंधी गैरसमज निर्माण करणारा प्रचारही कानी आला. म्हणून स्पष्टीकरण आपल्या समोर ठेवीत आहे.

माझा सर्व रोख गिरीधर भाईंनी आश्रमात राहून सुरू केलेल्या खाजगी सावकारीविरूद्ध होता. बावीस वर्षे विनोबांच्या सान्निध्यात पवनार आश्रमात राहिलेला हा माणूस. यासाठी पवनारहून त्याला हाकलण्यात आले. मग सेवाग्रामने त्याला स्थान का द्यावे ? येथे आल्यावर तर त्याने आपला सावकारी धंदा उघडपणेच सुरू केला. वारशाने मिळालेले अडीच लाख रुपये भरमसाठ दराने व्याजी लावून पाच वर्षात दामदुप्पट करावेत अशी आश्रमीय जीवनाशी पूर्ण विसंगत असलेली लालसा त्याने बाळगली व वैयक्तिक स्वार्थापोटी तो अनेक खोटेनाटे इतर व्यवहारही करू लागला.

गेले वर्षभर मी या प्रकाराचा निषेध करीत आहे. परंतु कोणी या निषेधाची विशेष दखल घेतली नाही. उलट या अपप्रकारांना आतून प्रोत्साहनच मिळत गेले. विशेषतः निर्मलाबेन यांनी अशा व्यक्तीच्या समर्थनासाठी, संरक्षणासाठी पुढे यावे याचे मला अतोनात दुःख झाले. निर्मलाबेन यांच्या अनेक गुणांचा मी चहाता होतो व आहेही. परंतु त्यांची ही वागणुक पाहून मला फारच क्लेश झाले. ( निर्मला बेन-रामदास गांधींच्या विधवा पत्नी, म. गांधींच्या स्नुषा)

आश्रमात मी नोकर म्हणून कामाला राहिलेला नव्हतो. एक सहकारी म्हणून मला येथे बोलावले गेलेले होते. असे असताना आश्रम चालविण्याबाबत एकतर्फी निर्णय घेतले जात होते. हे मला खटकत होते व याची स्पष्ट जाणीव मी आपल्याला करून दिली होती. तरी परिस्थितीत काही सुधारणा दिसेना म्हणून आश्रम सोडल्याशिवाय मला गत्यंतर उरले नाही.

माझ्या शेतीज्ञानाविषयी व प्रत्यक्ष कार्याविषयी अनेकजणांनी गौरवोद्गार काढले. या सर्वांचा मी आभारी आहे. परंतु एकच गोष्ट मला मुद्दाम स्पष्ट करावीशी वाटते : शेती वगैरे या सर्व गोष्टी आश्रमाची बाह्यांगे आहेत. आपला मुख्य आग्रह एकादश व्रतांचे परिपालन करणे हा असला पाहिजे.

सेवाग्राम आश्रमाचे व्यवस्थापक श्री. चमनलाल भाई यांना पाठविलेल्या आपल्या या वरील पत्राची एक प्रत गोविंद रेड्डी यांनी गोविंदपूरला स्वामिजींकडे पाठविली

। १६५ ।