पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/171

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पुढे पडले हे खरे.घेवाण कमी, देवाण जास्त झाली. पण सूत्र लखनौ कराराचे होते! फार तर एवढे म्हणता येईल की, गंगेची मातीच थोडी मऊ ! गंगेचे खोरे अधिक दार, अधिक सहिष्णू !

पण उपाय काय ? हेच तर हिंदुस्थानच्या राजकारणाचे मर्मक्षेत्र आहे. जी विचारसरणी, जो नेता हे खोरे काबीज करू शकतो तोच सर्व भारतावरही प्रभुत्व गाजवत रहातो. या हिंदी भाषिक प्रदेशाचा प्रचंड दबाव उर्वरित हिंदुस्थानावर पडलेला आहे. जसेजसे दक्षिणेकडे, पूर्वेकडे जावे तसतसे हे अधिक ध्यानात येते. आपण ज्यांना सरसकट फुटीरतेच्या चळवळी म्हणून संबोधतो, तो अनेकदा या दबावाविरुद्ध प्रकट झालेला असंतोष असतो. परंतु असंतोष असला आणि तो वाढला तरी हे सत्य आपण ओळखले पाहिजे की, हा दबाव पुढील काही दशके तरी कमी होण्याची मुळीच शक्यता नाही. कारण आपण लोकशाही पत्करलेली आहे, बहुसंख्याक हिंदी प्रदेशांचे वर्चस्व हा या लोकशाहीचाच एक अटळ परिणाम आहे. म्हणून पुढचा पेच येतो : लोकशाही हि तोवर दबाव आहे. दबाव आहे तोवर मुस्लिम तडजोडवाद आहे. मुस्लिम तडजोडवाद आहे तोवर नेहरूच काय, कुठलाही राजकीय नेता, पक्ष, तुला अभिप्रेत असलेली आधुनिकता मुस्लिम समाजावर लादू धजणार नाही. ही एक कोंडी आहे आणि जनसंघासारखा पक्षही--तो लोकशाहीवादी आहे. तोवर--या कोंडीत सापल्याशिवाय राहणार नाही. तुला भीती वाटते तसा 'जातीय' राहू शकणार नाही. खारीचे तुझे मुसलमान बांधव तुला फारच छळू लागले तेव्हा तूच नाही का चिडून एकदा लिहिलेस : And mind you, this is happening in a state wherein the Jan Sangh is a member of the coalition. जनसंघ संविद सरकारात सामील असतानाही मुसलमानांचा माजोरीपणा चालू होता हे तूच म्हणतोसः कसा कमी होईल हा माजोरीपणा ! मुसलमानांची वट्ट मते जनसंघाला नको आहेत असे थोडेच आहे!

मित्रा, तुलाही ही कोंडी जाणवलेली असावी. म्हणून वैतागून अनेकदा एखाद्या लष्करशहाला तू हाका मारल्यास. त्याने यावे आणि ही सगळीच जुनी घाण साफ करून निघून जावे असे तुला वाटत होते. पण एकदा आल्यावर कुणी परत सहजासहजी जात नसतो आणि आलेला केमालपाशाच असेल याची शाश्वती नसते, हे तू कसे विसरलास ? एक खरे की, या तुझ्या हाकांमुळे तुझे अनेक सहकारी, हित चिंतक तुझ्यावर नाराज झाले, काही तर बिथरले. तुला त्यांनी रागारागाची पत्र पाठविली. तू कोणाला उत्तरे दिली नाहीस, पण आपले मत मात्र पुनः पुन्हा मांडत राहिलास : ही राजवट उलथली पाहिजे. हा समाज बदलला पाहिजे. Some drastic step is necessary.

। १६४ ।