पान:श्रीग्रामायन (Shrigramayan).pdf/130

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जमीन कबजा आंदोलन


अप्रिय परंतु सत्य सुंदरपणे सांगणे अवघड असते. पण विनोबांनी जमीन कबजा आंदोलनाबाबत हे अवघड काम नुकतेच केलेले आहे. आपल्या नेहमीच्या अहिंसक पद्धतीने. एका मुलाखतीद्वारा त्यांनी आंदोलनाला आपला नैतिक पाठिंबा दिला. एक मेखही मारून ठेवली. त्यामुळे पाठिंबा काढून घेतला असेही वाटावे.

मेख ही : आंदोलन करणाऱ्यांनी जमिनी खरोखरच बळकावून दाखवाव्यात. घेतलेल्या जमिनीचा कबजा कायम राहिला पाहिजे.

हे घडणे शक्यच नाही. आंदोलनाची आखणी ज्या पद्धतीने झाली त्यातून असे काही भरीव, कायम स्वरूपाचे पदरात पडण्याचा संभव नाही. प्रश्नाकडे लक्ष मात्र वेधले जाईल. जे काम विनोबा आज दहा-पंधरा वर्षे करूनच राहिले आहेत. शासन काही सुधारणा घोषित करील. पण भूमीचा भूमिहीनांकडे मोठ्या प्रमाणावर ताबा जाणे ? अशक्य.

ही मेख विनोबांनी का ठोकली असावी ? त्यांना आलेला वाईट अनुभव.

भूदान चळवळीची या सर्व डाव्या पक्षांनी आजवर मनमुराद हेटाळणी केली तिच्यात अनंत दोष आहेत. मान्य आहे. तरीही ती उचलणे, पुढे नेणे, आपली ताकद तिच्यामागे उभी करणे, समाजकारणाचा आणि राजकारणाचा सांधा जमवून घेणे योग्य ठरले असते. स्वतःला क्रांतिकारक समजणारऱ्या डाव्या पक्षांची तर ही विशेष जबाबदारी होती. ही जबाबदारी त्यांनी पार पाडली नाहीच, वर उपेक्षेचा गुन्हा केला. आज वस्तुस्थिती मात्र अशी आहे की, या उपेक्षित चळवळीने, थोडे का होईना प्रत्यक्षात जमीनवाटप करून दाखविलेले आहे. सर्वोदयवादी म्हणत आहेत जवळजवळ बारा लाख एकर भूमी त्यांनी आजवर वाटली. मिळाली पन्नास लाख एकर. आपण लाखाचे हजार धरू. काही हजार एकर जमीन तरी या चळवळीमुळे भूमिहीनांच्या प्रत्यक्ष ताब्यात मिळाली, हे नाकारण्यात अर्थ नाही. केवळ ठाणे जिल्ह्यात सहज, वरवर चक्कर मारली तरी, भूदानात मिळालेली जमीन कसणारे, तिच्यावर मालकी सांगणारे आदिवासी भेटतात. नवीन वाटपाचे रीतसर कागदपत्र पहायला मिळतात. किमान काही हजार एकर जमीन श्रीमंतांकडून

। १२३ ।