पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/१४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वाहून गेलेली शेते तर दुरुस्त होतील? त्यांना गरजेनुसार इन काईंडस् प्रत्यक्ष वस्तूच्या स्वरूपात मदत करू म्हणजे सिमेंटची पोती... विटा...ट्रॅक्टरचे भाडे वगैरे. मात्र एक अट घालायची. केवळ मजूर लावून बंदिस्ती करायची नाय, तर घरातील लोकानीही पतीपत्नी, मोठी मुले यांनीही काम करायचं. शिवाय सल्ला देण्यासाठी आपले कार्यकर्ते आहेतच. मन्या शेतीचा डिप्लोमावाला आहे. तर मनीचा नवरा बांधकामाची कॉन्ट्रक्टस घेतो... काय? बोल ना! आणि दुसरी अट... आता जर दहा हजाराची मदत दिली असेल तर वर्षभरात ते पैसे परत फेडायचे. व्यवस्थापन खर्च म्हणून पाचशे रूपये घ्यायचे. पण एक महिना उशीर झाला तरी महिन्याला शेकडा दोन रूपये दंड... काय? शिवाय ज्यांची शेत वाहून गेली त्यांना दगडांची पौळ... बांध बंदिस्तीसाठी बी-बियाणे, खते यासाठी मदत, म्हणजे उत्तम बियाणे व खतच द्यायचे. आपल्या मित्र मंडळीत ॲग्रोचे पदवीधरही आहेत. त्यांची मदत घेऊ काय? ऐकते आहेस ना तू?
 'अने, तू बघच. पहात पहाता उसनवारीने दिलेला पैसा परत आल्यावर हा परत केलेल्या रकमेचा आकडा एवढा वर जाईल की कोणाकडे पैशांची मदत मागायचीही गरज पडणार नाही. या रिव्हाल्हींग फंडातून फिरत्या रकमेतून आगाताच्या आणि रबीच्यासाठी लहान शेतकऱ्यांला खतबियाणांची मदत करता येईल. लोहार... सुतार... कुंभार... चांभाराला त्यांचा व्यवसाय करण्यासाठी उसनवार देता येईल....'
 आजवर केवढं प्रेम केलं.. किती विश्वास टाकला डोंगरातल्या माणसांनी! त्यांच्या कोरडवाहू जमिनीला पाणी, हातांना काम... हिरवा डोंगर....
......
 अने तुला आठवतं, वसंतराव नाईकांनी सामुदायिक विहिरीचं स्वप्न महाराष्ट्रात पेरण्याचा प्रयत्न केला. पण शासनाचे कागदी घोडेच नाचले नि योजनेचा कचरा झाला. एक नि दीड एकरवाल्याची जमीन भिजायची. तर तेच स्वप्न आपण नव्या उमेदिने शेतकऱ्यांच्या सहभागातून पुन्हा पेरू या... ते नक्कीच जोमाने ... उगवेल. त्याला स्वार्थाची, भ्रष्टाचाराची कीड लागेल. सगळेच कार्यकर्ते लोकसेवक असतील. अल्पशा गरजेनुसार मानधन घेणार....'
 अने, ऐकते आहेस ना तू?" श्रीनाथ धूनमध्ये बोलत होता. स्वप्नात हरवलेल्या श्रीला अनू शोधत होती. हालवून हालवून हाक मारीत होती. पण तो खूप दूर नव्या अकराव्या दिशेने वेगाने वाहून जात होता...


शोध अकराव्या दिशेचा / १४४