पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/96

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

होते. मार्क्सच्या तर पुस्तकापुस्तकातून त्याच्या विचारात होणारा बदल लक्षात येतो. १९७५ मध्ये सापडलेल्या काही हस्तलिखितांतून आयुष्याच्या शेवटी मार्क्स काही अगदी वेगळाच विचार मांडण्याच्या प्रयत्नाला लागला होता असे दिसते. मग अशा विचारवंतांच्या एकूण विचारपद्धतीचा अर्थ लावण्याची शास्त्रीय पद्धती कोणती? जोतीबांच्या विचारात हिंदू धर्मावरील हल्ला, इतिहासाचे नवे अवलोकन, शिक्षणप्रसाराची चळवळ, सत्यशोधक धर्म, स्त्रीशिक्षण, ब्राह्मण विधवांस मदत असे अनेक पैलू आहेत. या वेगवेगळ्या रत्नांची मांडणी योग्य त्या कोंदणात बसवून करायची कशी?

 यासाठी विचार म्हणजे काय आणि वास्तवाशी त्याचा काय संबंध आहे, याविषयी एक स्पष्ट सैद्धांतिक भूमिका असणे आवश्यक आहे. कोणा एका माणसाचा किंवा समाजाचा विचार बदलला, त्यांना काही नवा विचार सुचला, नवी दिशा आढळली आणि म्हणून त्यांनी सगळा संसार बदलवला असे होत नाही. वास्तविक परिस्थितीत बदल घडवून आणण्याची मनुष्याची आणि मनुष्यसमाजाची सहजप्रवृत्ती आहे. कालच्या पेक्षा आज पोषण अधिक चांगल्या दर्जाचे व्हावे आणि कालच्या पेक्षा आज प्रजोत्पादनाच्या कामातही विविध रंगछटा फुलून याव्यात या दृष्टीने व्यक्ती आणि समाज धडपडत असतात. स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावण्याच्या या निसर्गसिद्ध इच्छेने त्यांचा व्यवहार ठरत असतो. त्या व्यवहाराचे समर्थन करण्याकरिता विचार एक सोय म्हणून वापरला जातो. विचाराने वास्तव ठरत नाही, वास्तवाच्या सोयीसोयीने विचार मांडला जातो.

 कोणत्याही एका समाजात कोणत्याही काळी कोणाही एका विषयावरील वेगवेगळी मते असतात; अगदी परस्पर टोकांचे विचार असतात. कोणाचे काय मत असेल हे शंभरात नव्याण्णव वेळा ज्याच्या त्याच्या आर्थिक- सामाजिक हितसंबंधांच्या आधारानेच ठरते. प्रत्येक विचाराचा मूळ गाभा एका आर्थिक- सामाजिक व्यवस्थेचा असतो. त्या व्यवस्थेच्या अनुषंगाने सोयीसोयीने इतिहास मांडला जातो. अगदी भूगोलही बदलला जातो, सोयीसोयीने साहित्य बनते, कलांचा आविष्कार होतो आणि सौंदर्यशास्त्रसुद्धा सोयीसोयीनेच ठरते.

 रस्किन, टॉलस्टॉय, गांधी यांच्या विचारांत उतरणीला लागलेल्या जमीनदार वर्गाच्या आर्थिक घसरगुंडीचे प्रतिबिंब आहे. मार्क्सच्या विचारात उगवत्या कामगारांच्या मनीषांचे चित्र आहे. भांडवलनिर्मितीच्या प्रक्रियेविषयी मार्क्सचा आर्थिक सिद्धांत हा त्याच्या विचारांचा पाया; इतिहासापासून ते पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र इथपर्यंत त्याने केलेले अवगाहन हा त्याच्या विचारांचा व्यापक

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / ९१