पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/95

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बंडखोर ब्राह्मण", "चोर बंडखोर” इत्यादी असा करतात. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीतील पहिल्या टप्प्याचा जोतीबांनी लावलेला हा अर्थ मान्य करणे त्यांच्या आजच्या समर्थकांना झेपण्यासारखे आणि परवडण्यासारखे आहे काय?

 किंबहुना, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना हीच मुळात आर्य भटांचा स्वार्थ साधण्याकरिता व इंग्रजांचे राज्यात शूद्रांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार पहिल्यांदा मिळत असल्यामुळे इंग्रजांविषयी द्वेष निर्माण करण्याकरिता केलेली आहे हे जोतीबांचे म्हणणे त्यांचे भक्त म्हणवणारे मानतात काय?

 थोडक्यात, जोतीबांचे नाव मिरवणारे आणि कधीकाळी हुल्लडबाजी करण्याची संधी मिळाली तर त्यांचा उदेउदे करणारे त्यांचे पाठीराखे जोतीबांचा विचार समजून उमजून काही करतात असे नाही. जोतीबांवर हल्ला चढविणारे आणि त्यांचे समर्थन करणारे या दोघांचीही शेतकऱ्यांचे शोषण आणि त्याचा इतिहास या विषयांवरील मते एकसारखीच आहेत आणि विशेष दुःखाची गोष्ट ही, की दोघांचीही मते जोतीबांनी मांडलेल्या विचाराच्या पूर्ण विरोधी आहेत.

 सगळ्याच महात्म्यांचे सगळ्यांत मोठे दुर्दैव म्हणजे त्यांचे शिष्य. पाश्चिमात्य विद्येचा चुटपुटताच संपर्क लाभलेल्या जोतीबांनी तत्त्वज्ञानाचे सर्वोच्च शिक्षण मिळालेल्या मार्क्सपेक्षाही सज्जड असा एक विचार मांडला. जोतीबांच्या विचारातील तेजस्वी सत्यकण कोणते आणि भरणा करण्याकरिता केलेली भरताड कोणती याचा विवेक करून, त्यांचा विचार पुढे मांडणारे शिष्य त्यांना मिळाले असते तर जोतीबांचे नाव आज महाराष्ट्रापुरते किंवा भारतापुरते मर्यादित न राहता जगाच्या थोर विचारवंतांच्या यादीत अग्रक्रमाने तळपले असते. रामदासांच्या शिष्यांनी रामदासांच्या ऐहिक शिकवणुकीचा पराभव केला. महात्मा गांधींचेसारखे शिष्य केवळ 'सूतकाते' राहिले. तसेच जोतीबांचेही शिष्य जोतीबांच्या शिकवणुकीतील जातिसंघर्षाच्या विचाराचा अर्थ समजून न घेता केवळ जातीयवादी द्वेष पसरविणारे निघाले. त्यामुळे जोतीबा म्हणजे आर्य-भटविरोधी, भट ब्रह्मणांचे द्वेष्टे, जातीयवादी अशी एक समजूत रूढ झाली.

 जोतीबा फुल्यांच्या पंक्तीतील द्रष्टे विचारवंत वेगवेगळ्या निमित्ताने, वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या विषयांवर उदंड लिखाण करतात. या सगळ्या लिखाणात विचारांची सुसंगत मांडणी होतेच असे नाही. किंबहुना, सर्वसामान्य माणसांप्रमाणेच या महात्म्यांच्या आयुष्यातही विचारांचा सतत विकास होत असतो. महात्म्यांच्या विचाराला एक सर्वव्यापकता असते आणि काळाची परिमितीही असते. 'हिंदू स्वराज्या'तील गांधी आणि १९४६ सालचे महात्मा गांधी यांच्यात फार प्रचंड अंतर

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / ९०