आजकाल देवादिकांवर टीका झाली तर त्याचा कोणी फारसा विषाद मानत नाही. रामकृष्णांच्या लीलांचा अभद्र, अश्लील, बीभत्स अर्थ अभ्यासाने किंवा बिनअभ्यासाचा मांडला तरी फारशी आरडाओरड होत नाही; झाली तरी ती मिटवून घेतली जाते. डॉ. आंबेडकरांच्या 'रिडल्स'विषयी झालेला वाद हे असेच एक उदाहरण आहे.
मध्यंतरी प्रसिद्ध झालेल्या जोतीबांवरील लेखाच्या निमित्ताने माझ्या मनात एक प्रश्न आला, "देवादिकांच्या उत्पत्तीसंबंधी वगैरे जोतीबांनी काही अभद्र लिहिले, त्यावर थोडा वादविवाद झाला आणि तो शमलाही; पण या वादविवादात जोतीबांच्या समर्थनाकरिता उतरलेल्या शूरवीरांनी, जोतीबांनी इतिहासकालीन व्यक्तिविषयी जे काही लिहिले आहे ते वाचूनही त्यांचे समर्थन केले असते का?" उदाहरणार्थ,
"...मुकुंदराज, ज्ञानेश्वर वगैरे रामदासासारखे अनेक 'पायलीचे पंधरा आणि अधेलीचे सोळा' ब्राह्मण ग्रंथकार होऊन वाया गेले..." हे जोतीबांचे मत त्यांना पटण्यासारखे आहे का? किंवा "... (आद्य) शंकराचार्याने तुर्की लोकांस मराठ्यांत सामील करून घेऊन त्यांजकडून तरवारीच्या जोराने येथील बौद्ध लोकांचा मोड केला..." हे जोतीबांचे विधान त्यांना मान्य होण्यासारखे आहे का? किंवा
"...हजरत महंमद पैगंबराचे जहांमर्द शिष्य, आर्य भटांचे कृत्रिमि धर्मासहित सोरटी सोमनाथासारख्या मूर्तीचा तरवारीचे प्रहारांनी विध्वंस करून, शूद्र शेतकऱ्यांस आर्यांचे ब्रह्मकपटांतून मुक्त करूं लागले.." किंवा
"मुसलमान लोकांनी ... (आर्यभटांनी) जुलमाने दासानुदास केलेल्या शूद्रादि अतिशूद्राचे कळपाचे कळप त्यांच्या तावडीतून सोडवून मुलसमान करून... त्या सर्वांबरोबर रोटीबेटी व्यवहार सुरू करून, त्या सर्वांस सर्व कामी बरोबरीचे हक्क दिले..." असे म्हणण्याची हिंमत या समर्थकांत आहे काय?
शिवाजी हा धर्मभोळा, अज्ञानी शूद्र राजा होता, त्याने देश म्लेंछापासून सोडवून गायीब्राह्मणांचे कसे पालन केले याविषयी हूलथापा देऊन (भट) शूद्र मुलांचे मनांत देशाभिमानाची खोटी तत्त्वे भरवितात हे जोतीबांचे विधान त्यांचे समर्थक म्हणविणाऱ्यांना खरोखर मान्य आहे काय?
जोतीबा फुले १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचा उल्लेख "परदेशी भटपांडे, कोकण्या नाना, तात्या टोप्या वगैरे अनेक देशस्थ भटजींनी केलेले थोरले चपाती गूढ बंड," असा करतात. हा विचार मानण्याची धमक आजकालच्या जोतीबासमर्थकांत आहे काय?
वासुदेव बळवंत फडक्यांच्या कामगिरीचा उल्लेख जोतीबा "हत्यारबंद पोलिसांच्या उरावर दरवडे घालणारा भट फडका", "फडके वगैरे निमकहरामी