पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/92

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सभासंमेलनांपर्यंत लेखकाच्या व संपादकाच्या निषेधाचे ठराव झाले. लेखक-संपादकांना चाबकाने मारले पाहिजे इतक्या कडेलोटाची भाषा झाली. जोतीबा फुल्यांच्या बचावासाठी इतके प्रखर संरक्षक उभे राहिले ही गोष्ट काही कमी भाग्याची नाही.

 पण फुल्यांच्या संरक्षणाकरिता सरसावलेल्यांना फुल्यांच्या विचारांची कितपत माहिती होती? किंबहुना, त्यांच्यापैकी कोणी फुले-वाङ्मय नजरेखालून तरी घातले असेल किंवा नाही याबद्दल जबरदस्त शंका आहे. फुल्यांची तरफदारी करणाऱ्यांत अभिनिवेश जास्त आणि अभ्यास कमी; त्यामुळे फुल्यांवर चिखलफेक करणाऱ्या लेखकांना चोख उत्तर देणे हे झालेच नाही. भाषा गुद्द्यांची झाली, मुद्द्यांची नाही.

 म.जोतीबा फुले यांनी 'गुलामगिरी' या पुस्तिकेत हिंदूधर्मग्रंथांत विष्णूच्या दशावताराच्या संदर्भात ज्या काही कथा सांगितल्या आहेत त्यांच्यावर झोड उठविली. अनेक ठिकाणी उपहासाच्या भरात फुल्यांचे व्युत्पत्तिशास्त्रही दोषास्पद राहिले. भाषाही त्या काळात शिष्टसंमत होण्यासारखी राहिली नाही. एवढेच नव्हे तर तर्कशास्त्राचाही फारसा बोज त्यांनी ठेवला नाही. उदाहरणार्थ,

 ".... ब्रह्मयाचे मुख, बाहू, जंघा आणि पाय या चार ठिकाणच्या योनी दूरशा झाल्यामुळे त्यास एकंदर सोळा दिवस सोवळे होऊन बसावे लागले असेल..."

 "....(ब्रह्मयास) रांड्याराघोबा म्हणावें तर, त्याने सरस्वती नांवाच्या कन्येशी व्यभिचार केला व त्यामुळे त्याचे आडनांव बेटीचोद पडले..."

 "....ब्रह्मा मेल्यानंतर आर्य लोकांच्या मूळच्या नांवाचा आपोआप लोप होऊ. त्यांचे नांव ब्राह्मण पडले..."

 "...पुढे त्या विप्रीय शब्दापासून त्यांचे नाव विप्र पडले असावे..."

 "...खंडोबाचे हाताखाली बहुत मल्ल असत, म्हणून त्यास मलूखान म्हणतात..."

 "... त्याने कधी आपल्यास पाठ दाखविलेल्या शत्रूवर वार केला नाही, म्हणून त्याचे नांव मारतोंड पडले होते. ज्याचा अपभ्रंभ मार्तंड हा आहे..."

 "...(मल्हारीने) स्थापिलेला एक प्रसिद्ध मल्हार राग आहे. तो इतका उत्तम आहे, की त्याच्या आश्रयाने मिय्या म्हणून जो मुलसमान लोकांमध्ये प्रसिद्ध गायक होऊन गेला त्यानेसुद्धा दुसरा एक मल्हार केला आहे..."

 "...नारदासारख्या बायकांतील पावली कम आठ भाऊजीने..."

 जोतीबांनी 'चार तोंडांचा ब्रह्मया', 'दहातोंड्या रावण' यांच्या भाकडकथा, वेदोपनिषदांची लुच्चेगिरी यांना फरा ओढत बाहेर काढले.

 जोतीबांच्या काळातही चिपळूणकर आदींनी जोतीबांच्या अशिष्ट भाषेबद्दल,

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / ८७