प्रस्तावना
'शेतकऱ्याचा असूड : शतकाचा मुजरा' या पुस्तकाची पहिली आवृत्ती १७ फेब्रुवारी १९८४ रोजी प्रसिद्ध झाली. शेतकरी संघटनेच्या परभणी अधिवेशनात त्या आवृत्तीचे प्रकाशन झाले. प्रकाशनाच्या दिवशीच पहिली आवृत्ती संपून गेली आणि अगदी संदर्भाकरितासुद्धा एखादी प्रत मिळणे कठीण झाले. मराठी पुस्तकांच्या इतिहासात ही अपूर्वच घटना म्हटली पाहिजे. पुस्तकाची दुसरी आवृत्ती काढावी, निदान पहिल्या आवृत्तीचे पुनर्मुद्रण करावे असे गेली ५ वर्षे सतत वाटत होते; पण संघटनेच्या कामाच्या धबडग्यात हे राहूनच गेले. संघटनेच्या कामाचा झपाटा इतका की नवीन आंदोलन, नवीन कार्यक्रम, त्यासंबंधी नवीन प्रकाशन आणि प्रचारसाहित्य यातच कार्यकर्त्यांची शक्ती अपुरी पडते. एखादी संपलेली आवृत्ती प्रसिद्ध करण्यासारखे काम अर्थातच मागे पडते.
काही दिवसांपूर्वी 'शेतकऱ्याचा असूड' हे महात्मा जोतीबा फुल्यांचे पुस्तक वेगवेगळ्या विद्यापीठांत अभ्यासक्रमात लावले गेले. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मडळाने 'महात्मा फुले : समग्र वाङमय' हा ग्रंथ प्रसिद्ध केला त्या वेळी 'शेतकऱ्याचा असूड' पुस्तकाची प्रत मोठी दुरापास्त होती. विद्यापीठात पुस्तक लावल्याच्या कारणाने मूळ पुस्तकाच्या हजारो प्रती छापल्या गेल्या आणि त्या विद्यार्थ्यांच्या हाती आल्या ही आनंदाचीच गोष्ट म्हटली पाहिजे; पण त्यामुळे पुस्तक छापण्याला धंदेवाईक स्वरूप आले. पुस्तक छापले म्हणजे त्याला प्रस्तावना लिहिली पाहिजे असे म्हणून काही प्रस्तावना खरडल्या गेल्या. त्याच वेळी प्रस्तुत पुस्तकाची नवीन आवृत्ती विद्यार्थ्यांच्या हाती जाणे आवश्यक झाले.
'शेतकऱ्याचा असूड'चा व्यापक अर्थ विद्यार्थ्यांच्या आणि इतर अभ्यासूंच्या नजरेस आणून देणे हे आज आणखी एका कारणानेही महत्त्वाचे झाले आहे. मध्यंतरी कोण्या एका विद्वानाने कोण्या एका साप्ताहिकात जोतीबा फुले यांच्यावर टीका करणारा एक लेख लिहिला. या लेखामुळे साहजिकच अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या असाव्यात. महाराष्ट्र राज्य विधानसभेपासून ते गल्लीवाडीतल्या