पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/87

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा रोख हा इतका जूना आहे. तळागाळाशी जाऊन शेतकऱ्यांतून सैनिक तयार करून स्वराज्य तयार करण्याचा प्रयत्न एक शिवाजीराजांनी तयार केला. तो प्रयत्न अल्पजीवी ठरला. कारण शेतकऱ्यांचा असा काळ अजून आलेला नसावा. आज चारशे वर्षांनंरतही शिवाजीराजांनी जो प्रश्न सोडण्याचा प्रयत्न केला तोच प्रश्न आ वासून उभा आहे. तो सोडविण्याचा मार्ग शिवाजी राजांनी दाखवून दिला. अशी राज्यव्यवस्था तयार करायची की जिचा मुख्य हेतूच रयतेचे सुख हा आहे, जी व्यवस्था शेतीच्या विकासाला मदत करेल आणि त्यातून पूरक व्यापार उद्योगधंदे यांची वाढ घडवून आणेल. राज्यकर्ते इतिहासात सदैव रयतेला लुटणाऱ्यांचे नायक राहिले. रयतेचा पहिला नायक शिवाजीराजा.

 आजही पुन्हा तळागाळात जाऊन नवे येसाजी कंक, तानाजी मालुसरे एकत्र करण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांच्या लुटारूंवर जरब सवून 'एकमय लोकराष्ट्र' उभे करायचे आहे. सामान्य रयतेच्या सुखाचा महाराष्ट्र धर्म देशभर न्यायचा आहे. हे काम करण्याकरिता पुन्हा एकदा शिवाजी राजांसारख्या अवतारसदृश पुरुषाचीच गरज आहे. नव्या स्वराज्य संस्थापनेची पूर्वतयारी 'शेतकरी संघटना' करीत आहे. कलियुगात संघटना हीच शक्ती असते. सतराव्या शतकातील धीरोदात्त नायकाचे काम आज शेतकऱ्यांच्या संघटनांकडे आल्याची चिन्हे जागोजाग दिसत आहेत. या वेळी शिवाजी राजे नीट समजून घेतले तर तीन शतकांच्या अवधीनंतर तरी त्यांचे स्वप्न साकार होण्याची शक्यता तयार होईल नाहीतर फिरून एकदा शेतकऱ्यांच्या स्वराज्याची आशा मालवून जाण्याचा धोका आहे.

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख / ८४