पान:शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख (Shetkryancha Raja Shivaji and itar lekh).pdf/76

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ऐसा दाणा, रतीब गवत मागाल, असेल तोवरी धुंदी करून चाराल. नाहीसे जाले म्हणजे मग काही पडत्या पावसांत मिळणार नाही, उपासपडतील. घोडी मारायास लागील. म्हणजे घोडी तुम्हीच मारिली ऐसे होईल व रयतेस तसवीस देऊ लागाल. ऐशास लोक जातील, कोणी कुणीब्याचेथील दाणे आणील, कोण्ही भाकर, कोण्ही गवत, कोण्ही फाटे, कोणी भाजी, कोण्ही पाले ऐसे करू लागलेत म्हणजे जे कुणबी घर धरून जीव मात्र घेऊन राहिले आहेत तेहि जाऊ लागतील, कितेक उपाशी मराया लागतील. म्हणजे त्याला ऐसे होईल की मोगल मुनकांत आले त्याहूनही अधिक तुम्ही. ऐसा तळतळाट होईल. तेव्हा रयतेची व घोडियांची सारी बदमानी तुम्हावरी येईल. हे तुम्ही बरे जाणून सिपाही हो अगर पावखलक हो बहुत यादी धरून वर्तणुक करणे, कोण्ही पागेस अगर मुलकात गावोगाव राहिले असाल त्यांनी रयतेस कडीचा आजार द्यावया गरज नाही. आपल्या राहिला जागाहून बाहीर पाय घालाया गरज नाही. साहेबी खजानांतून वाटणिया पदरी घातलिया आहेती. ज्याला जे पाहिजे, दाणा हो अगर गुरेढोरे वागवीत असाल त्यास गवत हो अगर फाटे, भाजीपाले व वरकड विकावया येईल ते रास घ्यावे, बाजारास जावे, रास विकत आणावे. कोण्हावरी जुलूम अगर ज्याजती अगर कोण्हाही कलागती करावयाची गरज नाही व पागेस सामा केला आहे तो पावसाळा पुरला पाहिजे . ऐसे तजविजीने दाणा रतीब कारकून देत जातील तेणेप्रमाणेच घेत जाणे, की उपास न पडता राजेबरोज खायाला सापडे आणि होत होत घोडी तवाना होत ऐसे करणे. नसतीच कारकुनासी धसफस कराया. अगर अमकेच द्या तमकेक द्या ऐसे म्हणाया, धुंदी करून खासदारकोठीत, कोठारात शिरुन लुटाया गरज नाही व हाली उन्हाळ्याला आहे तईसे खलक पागेचे आहेत, खण धरून राहिले असतील व राहातील, कोण्ही आगट्या करीतील, कोण्ही भलतेच जागा चुली, रंधनाळा करितील, कोण्ही तंबाकू ला आगी घेतील, गवत पडिले आहे ऐसे अगर वारे लागले आहे ऐसे मनास न अणिता म्हणजे अविस्त्राव एखादा दगा होईल. एका खणास आगी लागली म्हणजे सारे खण जळोन जातील. गवताच्या लहळ्यास कोणीकडून तरी विस्तो जाऊन पडला म्हणजे सारे गवत व लहळ्या आहेत तितक्या एके एक जाळी जातील. तेव्हा मग काही कुणबियांच्या गर्दना मारल्या अगर कारकुनास ताकिद करावी तैसी केली तऱ्ही काही खण कराया एक लाकूड मिळणार नाही, एक खण होणार नाही. हे तो अवघियाला कळते. या करणे, बरी ताकिद करून खाते असाल ते हमेशा फिरत जाऊन रंधने करिता आगट्या लाविता, अगर रात्रीस दिवा घरात असेल, अविस्त्राच उंदीर वात नेईल. ते गोष्टी न हो. आगीचा दगा न हो. खण, गवत वांचेल

शेतकऱ्यांचा राजा शिवाजी / ७३